भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) नंतर आता महानगर टेलीफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल)च्या कर्मचाऱ्यांकडून देखील स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) योजनेस मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आतापर्यंत एमटीएनएलच्या तब्बल १३ हजार ५३२ कर्मचाऱ्यांकडून व्हीआसएससाठी अर्ज करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. किमान १३ हजार ५०० कर्मचारी व्हीआरएस घेतील असा एमटीएनएलला अंदाज होता. मात्र आता हा आकडा त्यापेक्षाही पुढे गेल्याचे दिसत आहे. व्हीआरएससाठी अर्ज करण्याची मुदत संपण्यास अद्याप दोन आठवड्यांचा कालावधी बाकी आहे. एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३ डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहेत. एमटीएनएलचे अध्यक्ष सुनील कुमार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आम्हाला मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. कंपनीकडून होईल तितक्या कर्मचाऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आम्हाला अपेक्षित होते त्यापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांकडून अर्ज आले आहेत, हा आकडा किमान १४ ते १५ हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. एकूण १६ हजार ३०० कर्मचारी व्हीआरएससाठी पात्र आहेत. एमटीएनएलच्या सर्व नियमित आणि कायमतत्वावरील कर्मचाऱ्यांचे वय ३१ जानेवारी २०२० पर्यंत ५० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक होणार आहे. हे सर्व कर्मचारी देखील व्हीआरएससाठी पात्र असणार आहेत. 'एमटीएनएल'ला मागील दहा पैकी नऊ वर्षात तोटा झालेला आहे. तर बीएसएनएल देखील २०१० पासून तोट्यात आहे. दोन्ही कंपन्यांवर ४० हजार कोटी रुपायांचे कर्ज असल्याची माहिती आहे.