कारगिलच्या हुंडरमन गावातून नियंत्रण रेषा (LoC) ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या नागपूरच्या सुनीता जमगाडेला पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारतीय अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले आहे, पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली असून इंडियन एक्स्प्रेसने वृत्त दिलं आहे.
४३ वर्षीय जमगडे १४ मे रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने दहा दिवसांपूर्वी सीमा ओलांडली. तिच्या मुलाला मागे सोडून ती पाकिस्तानात गेली आणि तिकडे तिला पाकिस्तानी सैन्याने अटक केली.
अमृतसर पोलिसांच्या स्वाधीन
“सुनीताला परत आणण्यासाठी एक अधिकारी आणि दोन महिला कॉन्स्टेबल यांचा समावेश असलेले पथक अमृतसरला पाठवण्यात आले आहे”, असं पोलीस उपायुक्त (झोन पाच) निकेतन कदम यांनी सांगितले. “सीमा ओलांडल्यानंतर पाकिस्तानने सुनीता यांना ताब्यात घेतले. पाकिस्तान रेंजर्सने त्यांना सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) स्वाधीन केले आहे आणि बीएसएफने त्या महिलेला अमृतसर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे”, कदम पुढे म्हणाले.
“नागपूर कोठडीत आल्यानंतर आम्ही तिची चौकशी करू. ती हेरगिरीत सहभागी होती की इतर कोणत्याही बेकायदेशीर कृत्यात सहभागी होती का याची पडताळणी करण्यात येणार आहे”, असंही त्यांनी पुढे सांगितले. लडाख पोलिसांचे पोलीस महासंचालक (डीजीपी) डॉ. एसडी सिंह जामवाल यांनी गेल्या आठवड्यात द इंडियन एक्सप्रेसला सांगितले होते की सुनीता बेपत्ता होण्यापूर्वी पाकिस्तानी नागरिकांच्या संपर्कात होती.
महिलेविरोधात झिरो एफआयआर
अमृतसर पोलिसांनी शून्य एफआयआर नोंदवला आहे, जो तिचा कायमचा पत्ता नागपूरमध्ये असल्याने नागपूरमधील कपिल नगर पोलीस ठाण्यात हस्तांतरित केला जाईल. कदम पुढे म्हणाले, “भारत-पाकिस्तान सीमा ओलांडून चुकून येणाऱ्या व्यक्तींची देवाणघेवाण ही एक नियमित प्रक्रिया आहे. अशा प्रकरणांचे निराकरण सामान्यतः बीएसएफ आणि पाकिस्तान रेंजर्समधील संवादाद्वारे केले जाते.” जमगडे यांच्या बेपत्ता झाल्यानंतर बाल कल्याण समिती (सीडब्ल्यूसी) कडे असलेल्या १२ वर्षांच्या मुलालाही लवकरच नागपूरला परत आणले जाईल.
सुनीता जमगडे या एका रुग्णालयात परिचारिका होत्या. ती मानसिकदृष्ट्या आजारी होती, असंही तिच्या घरच्यांनी सांगितलं. बेपत्ता होण्याच्या आधी तिला प्रचंड मानसिक त्रास झाला होता.