लवकरच आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. हीच शक्यता लक्षात घेऊन भाजपासह इतर पक्षांचे नेते भारतभर दौरे करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील वेगवेगळ्या राज्यांत जाऊन तेथील नागरिकांना भाजपालाच मतदान करा, असे आवाहन करतायत. हे आवाहन करताना त्या-त्या राज्यातील विरोधी पक्षांच्या सरकारवरही मोदी सडकून टीका करताना दिसतायत. मोदी सोमवारी (४ मार्च) तमिळनाडूच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी तेथील सत्ताधारी डीएमके पक्षावर हल्लाबोल केला. डीएमके तमिळनाडूच्या जनतेच्या पैशांची लूट करत आहे. मात्र मी हे पैसे लुटू देणार नाही, असे मोदी म्हणाले. तसेच डीएमकेने लुटलेले पैसे मी परत तमिळ लोकांना परत करीन, असे आश्वासन मोदींनी दिले.

नरेंद्र मोदी काय म्हणाले?

नरेंद्र मोदी जनतेला संबोधित करताना म्हणाले की, भारत सरकार अनेक योजनांचा पैसा थेट येथील नागरिकांना देत आहे. डीएमकेला यावरच आक्षेप आहे. कोट्यवधी रुपयांचा लाभ थेट तमिळनाडूतील लोकांच्या खात्यात जात आहे. हीच बाब डीएमकेला खटकत आहे. आज शौचालय, गॅस कनेक्शन, नळजोडणी, आरोग्यविमा, रस्ते, रेल्वेसेवा, महामार्ग अशा वेगवेगळ्या बाबींवर काम होत आहे.

“… मात्र यातही डीएमकेला यश येत नाहीये”

“कोट्यवधी रुपयांच्या या विकासकमांना लुटण्यात डीएमकेच्या लोकांना अडचणी येत आहेत. यामुळेच डीएमके परेशान आहे. डीएमकेचे लोक विचार करत आहेत की, पैसे नाही तर कमीत या कामांचं श्रेय तरी घेता येईल. मात्र यातही डीएमकेला यश येत नाहीये,” अशी खोचक टीका मोदींनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…ही मोदी गॅरंटी आहे”

“डीएमकेला सांगू इच्छितो की मी तमिळनाडूच्या विकासाचा पैसा तुम्हाला लुटू देणार नाही. जो पैसे डीएमकेने लुटलेला आहे, तो वसूल करून परत तमिळनाडूच्या लोकांवर खर्च केला जाईल. ही मोदी गॅरंटी आहे,” असे जाहीर आश्वासन मोदींनी तमिळनाडूच्या जनतेला दिले.