हरिद्वारमध्ये झालेल्या वादग्रस्त धर्मसंसदेचे आयोजक यती नरसिंहानंद यांची एका न्यायालयाने रविवारी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. नरसिंहानंद यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २९५ (एखाद्या धर्माचा अपमान करून हेतुपुरस्सर धार्मिक भावना दुखावणे) आणि कलम ५०९ (महिलेच्या विनयभंगाच्या उद्देशाने केलेले कृत्य) या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गाझियाबाद येथील दासना मंदिराचे मुख्य पुजारी असलेले यती नरसिंहानंद यांना शनिवारी रात्री गंगेच्या सर्वानंद घाटावरून ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणातील दुसरे आरोपी जितेंद्र नारायण त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांच्या अटकेविरुद्ध ते तेथे सत्याग्रह करत होते.