Vice Presidential Election : संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर नवे उपराष्ट्रपती कोण होणार? याकडे अनेकांच्या नजरा लागलेल्या आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर दिल्लीत घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. उपराष्ट्रपती पदासाठी आज एनडीएच्या उमेदवाराची दिल्लीत घोषणा करण्यात आली आहे.

भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना एनडीएचा उमेदवार निवडण्याचा अधिकार दिला होता. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची आज दिल्लीत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.

कोण आहेत सी. पी. राधाकृष्णन?

राधाकृष्णन हे गेल्या तीन दशकांपासून भाजपाचे सक्रीय सदस्य आहेत. ते भाजपाच्या तिकीटावर दोन वेळा तमिळनाडूच्या कोईंबतूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. तसेच त्यांनी काही वर्षे तमिळनाडू भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं होतं. मात्र, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट असूनही ते पराभूत झाले होते. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर दीड वर्षांनी त्यांच्याकडे महाराष्ट्रासारख्या बलाढ्य राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचं वेळापत्रक कसं आहे?

-नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २१ ऑगस्ट २०२५ असेल.

-नामांकन अर्ज छाननीची तारीख २२ ऑगस्ट २०२५ असेल.

-उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०२५ असेल.

-मतदानाची तारीख ९ सप्टेंबर २०२५ असेल आणि त्यानंतर मतमोजणी होईल.

जगदीप धनखड यांनी का दिला राजीनामा?

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. खरं तर धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं असलं तरी त्यांच्या राजीनाम्यावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. जगदीप धनखड यांनी स्वत:हून राजीनामा दिला की त्यांना राजीनामा द्यायला लावला? असे अनेक सवाल विरोधकांकडून विचारले जात आहेत.