Defence Minister Rajnath Singh: ऑपरेशन सिंदूर आणि शस्त्रविराम झाल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू आणि काश्मीरमधील बदामी बाग छावणीला भेट दिली. यावेळी त्यांनी सैन्यातील जवानांशी संवाद साधला. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. तसेच पाकिस्तानकडून दिल्या जाणाऱ्या अणुबॉम्बच्या धमक्यांचा उल्लेख करत त्यांनी पाकिस्तानची अण्वस्त्रे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) देखरेखीखाली असावीत, असे म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मंगळवारी अशाच प्रकारची घोषणा केली होती. “भारतीय लष्कराने अणुबॉम्बच्या धमक्यांना न जुमानता चोख प्रत्युत्तर दिले. तेव्हा आपल्या शत्रूलाही ‘भारत माता की जय’चा अर्थ कळला”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रविराम झाल्यानंतर पाच दिवसांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज श्रीनगरचा दौरा केला. श्रीनगर विमानतळावर लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्वीवेदी यांनी त्यांचे स्वागत केले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यावेळी म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना हा संदेश दिला गेला की, ते कुठेही लपले तरी सुरक्षित राहणार नाहीत. आता ते आमच्या शूर अशा सैन्याच्या निशाण्यावर आहेत. जगाला हे माहीत आहे की, आमच्या सेनेचा निशाणा अचूक आहे. ते जेव्हा जेव्हा लक्ष्य भेदतात, तेव्हा मृतदेह मोजण्याचे काम शत्रूंवर सोडतात.”

“दहशतवादाविरोधात भारताने ठोस अशी पाऊले उचलल्याचे सर्वांनी पाहिले. पाकिस्तानच्या अणुबॉम्बच्या धमक्यांनाही आपण भीक घातली नाही. संपूर्ण जगाने पाहिले की, पाकिस्तानने बेजबाबदारपणे भारताला अणुबॉम्बच्या धमक्या दिल्या. आज श्रीनगरच्या भूमीतून जगाला प्रश्न विचारत आहे की, पाकिस्तान सारख्या बेजबाबदार आणि विशिप्त देशाच्या हातात अण्वस्त्र सुरक्षित आहेत का? पाकिस्तानची अण्वस्त्रे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) देखरेखीखाली घेतली पाहिजेत, अशी मागणी या निमित्ताने मी जगासमोर करत आहे”, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

आपल्या लष्कराने पाकिस्तानला जो धडा शिकवला तो ते विसरतील, असे वाटत नाही. भारतीय सेनेने, उत्साह आणि संयम यांचे अतुलनीय संतुलन दाखवत शत्रुच्या तळांना उध्वस्त केले. मी आज येथे संरक्षण मंत्री तसेच देशाचा संदेशवाहक या नात्यानेही आलो आहे. पूर्ण देशाच्या शुभेच्छा, त्यांच्या प्रार्थना आणि जनतेची कृतज्ञता तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी येथे आलो आहे, असेही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्हाला आमच्या सेनेवर गर्व आहे, असा संदेश देशातील जनतेने दिला आहे, तो घेऊन मी तुमच्यासमोर आज इथे आलो आहे.