PM Modi Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमाच्या १२२ व्या भागात ऑपरेशन सिंदूरवर भाष्य केले. ते म्हणाले, “संपूर्ण देश दहशतवादाच्या विरोधात एकवटलेला पाहायला मिळाला. प्रत्येकाला वाटत होते की, दहशतवाद संपवला जावा. आपल्या सैन्याने सीमेपलीकडील दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूर हे बदलत्या भारताचे दर्शन घडवते. आज प्रत्येकजण देशभक्तीच्या भावनांनी भरलेला आहे.”
ऑपरेशन सिंदूर ही मोहीम लष्करी कारवाईपेक्षा अधिक महत्त्वाची होती, यावरही पंतप्रधान मोदी यांनी प्रकाश टाकला. “ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी मोहीम नव्हती. तर ते आमच्या दृढनिश्चयाचे, धैर्याचे आणि बदलत्या भारताचे चित्र आहे”, असेही ते म्हणाले.
ऑपरेशन सिंदूर आता अनेक भारतीयांचा जीवनाचा भाग बनले आहे. बिहारमधील कटीहार, उत्तर प्रदेशमधील कुशीनगर आणि इतर अनेक ठिकाणी जन्मलेल्या बाळांना सिंदूर हे नाव देण्यात आले आहे, याकडेही पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधले.
पंतप्रधान मोदींनी सैनिकांच्या धाडसाचे आणि कौशल्याचे तसेच स्वदेशी तंत्रज्ञानाच्या वापराचेही कौतुक केले. भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले, हे त्यांचे अतुलनीय शौर्य होते. तसेच यासाठी त्यांनी भारतात तायर केलेली शस्त्रे, तंत्रज्ञान वापरली.
ऑपरेशन सिंदूरनंतर आता व्होकल फॉर लोकल ही संकल्पना अनेकांना प्रेरीत करत असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. एका पालकाने मला सांगितले की, ते आता त्यांच्या मुलांसाठी भारतीय बनावटीची खेळणी घेणार आहेत. देशभक्तीचे बाळकडू असे लहानपणीच दिले जात आहे. तर काही कुटुंबियांनी आता पुढची सुट्टी देशातीलच पर्यटन स्थळावर घालविण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक तरुण आता भारतातच डेस्टिनेशन वेडिंग करण्यास उत्सुक आहेत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. तुर्कियेने पाकिस्तानला साथ दिल्यानंतर भारताकडून तुर्कियेवर बहिष्कार टाकण्यात येत आहे, याची पार्श्वभूमी पंतप्रधान मोदींच्या कथनाला होती.
गडचिरोतील माओवादाचा उल्लेख
गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद संपुष्टात येत असून येथे प्रगती होत असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. “माओवादाच्या विरोधात सामूहिक लढाई सुरू असून गडचिरोली सारख्या भागात मूलभूत सुविधा पोहोचू लागल्या आहेत. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याच्या काटेझारी गावात पहिल्यांदाच बस पोहोचली. गावातील लोकांनी ढोल वाजवून बसचे स्वागत केले”, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
जीवन जोशी यांच्या प्रेरणादायी प्रवासाची माहिती
उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील ६५ वर्षीय जीवन जोशी यांच्याबद्दलही पंतप्रधान मोदी यांनी माहिती दिली. ते म्हणाले, पोलिओमुळे जीवन जोशी यांचे पाय अधू झाले पण त्यांचे धैर्य खचले नाही. जोशी यांनी पाईन झाडापासून बॅगेट नावाची कलाकृती तयार केली. या कलाकृतीमुळे या भागाची नवी ओळख निर्माण झाली आहे.