scorecardresearch

“मोदी सरकारच्या कामाचा वेग बघून तर उसेन बोल्टही…”; राहुल गांधींवरील कारवाईवरून पी. चिदंबरम यांची खोचक टीका!

मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द करण्यात आलं.

p chidambaram criticized modi government
फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम

मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द करण्यात आलं. अशात काल त्यांना दिल्लीतील त्यांचं निवास खाली करण्याची नोटीस लोकसभेच्या हाऊसिंग कमिटीकडून देण्यात आली. यावरून देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून काँग्रेसकडून देशभरात निर्देशने करण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेसचे दिग्गज नेते पी चिंदबरम यांनी या कारावाईवरून मोदी सरकरावर खोचक शब्दात टीका केली आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

हेही वाचा – राहुल गांधींची खासदारकी रद्द, आदित्य ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “देशात…”

काय म्हणाले पी चिदंबरम?

एखाद्या राजकीय टीकेसाठी कोणालाही दोन वर्षांची शिक्षा झालेली नाही. आजपर्यंत देशात असं कधीही घडलं नव्हतं. मोदी सरकारकडून एकप्रकारे यंत्रणांचा वापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुरत सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर मोदी सरकारनेच ज्या वेगाने कारवाई केली, तो वेग बघून उसेन बोल्टलाही आर्श्चय वाटेल, अशी खोचक टीका पी चिंदबरम यांनी केली. तसेच राहुल गांधी यांना मिळालेली शिक्षा ही अशा प्रकरणांमध्ये आजपर्यंतची सर्वात कठोर शिक्षा आहे, असेही ते म्हणाले.

काँग्रेसकडून देशभरात निदर्शने

दरम्यान, राहुल गांधींवरील कारवाईनंतर काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून देशभरात मोदी सरकावरविरोधात निदर्शने करण्यात आहेत. सोमवारी यासंदर्भात दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात बैठकही घेण्यात आली होती. याबैठकीला विरोधी पक्षातील नेतेही उपस्थित होते. या कारवाईनंतर विरोधकांनी एकत्र येऊन मोदी सरकारविरोधात लढावं, असं आवाहन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केलं आहे.

हेही वाचा – संसद सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “माझी खासदारकी रद्द करून…”

नेमकं प्रकरण काय?

राहुल गांधी यांनी कर्नाटकातील कोलार येथे आयोजित रॅलीत वादग्रस्त वक्तव्य केले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते, “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव एकसारखेच का आहे? सगळ्या चोरांची आडनावं मोदी का असतात?” असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर भाजपाचे माजी आमदार पूर्णेश मोदी यांनी आक्षेप घेतला होता. तसेच त्यांच्यावर सुरत सत्र न्यायालयात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. दरम्यान, याप्रकरणी काल राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोषी ठरवत दोन वर्षांच्या शिक्षा सुनावली होती. त्यानंतर राहुल गांधी यांचं संदस्यत्व रद्द करण्यात आलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 09:31 IST

संबंधित बातम्या