Pahalgam Terror Attack Update: पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर भारत व पाकिस्तानमधले संबंध चिघळले आहेत. दोन्ही बाजूंनी एकमेकांना चोख प्रत्युत्तर देण्याची विधानं होत आहेत. पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर भारतानं त्यावर तीव्र निषेध नोंदवला आहे. तसेच, आता पाकिस्तानला अद्दल घडवणार असल्याची विधानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून सर्वच केंद्रीय मंत्र्यांनी केल्यानंतर युद्धाची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर तिकडे पाकिस्तानमध्ये मात्र वेगळ्याच हालचाली सुरू झाल्याचं दिसून येत आहे.

पाकिस्तानच्या आजी-माजी राष्ट्रप्रमुखांसह अनेक नेतेमंडळी व लष्करी अधिकाऱ्यांनी भारताला सडेतोड उत्तर देण्याची विधानं केली असताना दुसरीकडे काही नेत्यांकडून तणाव निवळण्यासंदर्भातही आवाहनं केली जात आहेत. अमेरिकेनंही दोन वेळा मध्यस्थी करून दोन्ही देशांना तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत नेमकं काय घडणार? याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलेलं असताना पाकिस्ताननं अचानक कराची व लाहौरची हवाई हद्द बंद केली आहे.

फक्त चार तास सुरक्षेचा प्रश्न?

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान सरकारनं कराची व लाहौरची हवाई हद्द संपूर्ण मे महिन्यात रोज पहाटे ४ ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा काही स्थानिक माध्यमांनी केला आहे. मात्र, दिवसाच्या नेमक्या त्याच वेळी आणि फक्त चार तासांसाठीच सुरक्षेचा मुद्दा कसा असू शकतो? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं लागू केलेले निर्बंध व कारवाईच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननंदेखील प्रत्युत्तरासाठी सज्ज असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. दुसरीकडे सीमाभागात पाकिस्तानकडून पहलगाम हल्ल्यापासून रोज शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. पण आर्थिक संकट आणि सिंधू जल करार रद्द झाल्यामुळे पाण्याचं दुर्भिक्ष्य अशा दुहेरी विवंचनेत सापडलेला पाकिस्तान युद्धासाठी खरंच सज्ज आहे का? यावर आता चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, कराची व लाहौरच्या हवाई हद्दी चार तासांसाठी बंद ठेवल्यामुळे प्रवासी विमान वाहतुकीवर फार मोठा परिणाम होणार नाही, असा दावा पाकिस्तानच्या हवाई उड्डाण विभागाकडून करण्यात आला आहे. या काळात सर्व प्रवासी विमाने पर्यायी हवाई मार्गाने वळवण्यात येतील, असं नमूद करण्यात आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.