Pakistan PM Shahbaz Sharif Video: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ७ मे रोजी पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता. शस्त्रविराम झाल्यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताच्या कारवाईवर भाष्य केले आहे. पाकिस्तानमध्ये आयोजित एका समारंभात बोलत असताना शाहबाज शरीफ म्हणाले की, ९ आणि १० मे च्या रात्री अडीच वाजता लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी हॉटलाईनवरून भारताने केलेल्या ऑपरेशनची माहिती दिली.

पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले, “जनरल मुनीर यांनी रात्री अडीच वाजता सुरक्षित लाईनवरून मला फोन केला आणि भारताने हवाई हल्ला केल्याचे सांगितले. आमच्यासाठी हा एक गंभीर प्रसंग होता. भारताच्या क्षेफणास्त्रांनी नूर खान एअरबेस आणि इतर भागात हल्ला केल्याची माहिती त्यांनी दिली. आपल्या हवाई दलाने स्वदेशी तंत्रज्ञानाचा आणि चिनी विमानांचा वापर करत भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले.”

भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी शाहबाज शरीफ यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. शाहबाज शरीफ यांच्या भाषणातून ऑपरेशन सिंदूरची अचूकता, धाडस दिसून येते असे मालवीय म्हणाले.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मान्य केले आहे की, जनरल असीम मुनीर यांनी रात्री अडीच वाजता फोन करून भारताने नूर खान एअरबेस आणि इतर ठिकाणी हल्ला केल्याचे सांगितले. पाकिस्तानच्या आत हल्ले केल्यामुळे पंतप्रधानांची रात्री झोप उडाली. यावरूनच ऑपरेशन सिंदूरचे यश, धाडस आणि अचूकता दिसून येते, असे अमीत मालवीय म्हणाले.

२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २५ पर्यटक आणि एका स्थानिक काश्मीरी नागरिकाचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ७ मे रोजी मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील ९ दहशतवादी स्थळांना लक्ष्य केले. ऑपरेशन सिंदूरद्वारे २५ मिनिटांत केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांशी संबंधित ठिकाणांना उध्वस्त करण्यात आले होते.