Defence Minister Rajnath Singh: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्यदलाचे कौतुक करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह विविध लष्करी तळांना भेटी देत आहेत. आज त्यांनी गोव्याच्या किनाऱ्यावर विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतवरील अधिकारी आणि खलाशांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भारतीय नौदलाचे कौतुक करताना म्हटले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान जर नौदल उतरले असते तर पाकिस्तानचे चार तुकडे झाले असते. तसेच पाकिस्तान जर चर्चा करण्यासाठी गंभीर असेल तर त्यांनी आधी २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरला भारताच्या ताब्यात द्यावे, असेही ते म्हणाले.

पाकिस्तानच्या भूमीत दहशतवादाचे जे पिक आले आहे, ते त्यांनी स्वतःहून उखडून टाकले तर योग्य होईल आणि याची सुरुवात हाफिज सईद आणि मसूद अझहरला भारताच्या ताब्यात देऊन केली जाऊ शकते. ते दोघेही भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत आहेतच, त्याशिवाय संयुक्त राष्ट्रांनीही त्यांना दहशतवादी म्हणून जाहीर केलेले आहे, असेही राजनाथ सिंह म्हणाले.

पाकिस्तानकडून वारंवार चर्चेचा प्रस्ताव दिला जात आहे. याबद्दल बोलताना राजनाथ सिहं पुढे म्हणाले, “कालच पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा प्रस्ताव दिला. पण भारताने आधीच स्पष्ट केले आहे की, यापुढे चर्चा ही केवळ दहशतवाद आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरवरच होईल. जर पाकिस्तान चर्चेसाठी गंभीर असेल तर त्यांनी दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात द्यावे.”

नौदलाने गप्प राहून पाकिस्तानी सैन्याला रोखले

राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, भारतीय सशस्त्र दलाने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर जोरदार हल्ला केला. यावेळी नौदलाच्या मूक सेवेने सर्व भारतीयांना प्रभावित केले. शांत राहूनही नौदलाने पाकिस्तानी सैन्याला रोखण्यात यश मिळवले. यावेळी पाकिस्तानला भारतीय नौदलाचा सामना करावा लागला नाही. पण संपूर्ण जगाला याची कल्पना आहे की, जर पाकिस्तानने आगळीक केली असती तर नौदलाने नक्कीच हल्ला केला असता.

पाकिस्तानचे चार तुकडे झाले असते

१९७१ च्या भारत-पाक युद्धाची आठवण करून देताना राजनाथ सिंह म्हणाले की, १९७१ च्या युद्धात जेव्हा भारतीय नौदल ॲक्शन मोडमध्ये आले होते, तेव्हा पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान जर नौदल उतरले असते तर माझ्यामते यावेळी पाकिस्तानचे चार तुकडे झाले असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय हवाई दलाने जेव्हा पाकिस्तानी भूमीवरील दहशतवादी तळ उध्वस्त केले. तेव्हा अरबी समुद्रात नौदल तैनात असल्यामुळे आणि भारताचे सागरी क्षेत्रावर वर्चस्व असल्यामुळे पाकिस्तान नौदल त्यांच्या किनाऱ्यापुरतेच मर्यादित राहिले, असेही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.