पाकिस्तानी गायक अदनान सामीला भारतीय नागरिकत्व मंजूर करण्यात आले असून, १ जानेवारीपासून तो भारताचा नागरिक असेल. मानवतेच्या दृष्टीकोनातून आपल्याला भारतात राहू देण्यात यावे, अशी विनंती करत अदनान सामीने भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. काही दिवसांपूर्वी अदनान सामीने पाकिस्तानी नागरिकत्वाचा त्याग केला होता. मूळचा लाहोरचा असणारा अदनान सामी १३ मार्च २००१ रोजी पहिल्यांदा पर्यटक व्हिसावर भारतात आला होता.
अदनान सामी गेल्या १५ वर्षांपासून भारतात राहत आहे. त्याने बॉलीवूडच्या चित्रपटांमध्येही अनेक गाणी गायली आहेत. काही दिवसांपूर्वी अदनानच्या व्हिसावरून वाद उफाळून आला होता. २००१ साली एका वर्षाच्या व्हीसासह भारतात आलेल्या अदनाने वेळोवेळी व्हीसाचे नूतनीकरण केले होते. मात्र त्याच्या पासपोर्टची मुदत संपल्यानंतर पाकिस्तानी अधिका-यांनी त्याच्या नूतनीकरणास नकार दिला. त्यानंतर अदनानने गेल्या मे महिन्यात गृहमंत्रालयातील अधिका-यांची भेट घेऊन आपल्याला पाकिस्तानमध्ये पाठवले जाऊ नये, अशी मागणी केली. तेव्हा अदनानला अनिश्चित कालावधीसाठी भारतात राहण्याची परवानगी देण्यात आली होती. मानवतावादी भूमिकेतून त्याची ही मागणी मान्य करण्यात आली होती. कायद्यानुसार विज्ञान, तत्वज्ञान, कला, साहित्य, जागतिक शांतता या क्षेत्रांमध्ये विशेष योगदान देणाऱ्यांना भारतीय नागरिकत्व देण्याची सोय आहे.