पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिनानिमित्त घराणेशाहीवर हल्ला चढवताना वर्षानुवर्षे एका कुटुंबाकडून चालवले जाणारे राजकीय पक्ष लोकशाहीसाठी मोठं संकट असल्याचं मत व्यक्त केलं. तसेच ज्या राजकीय पक्षांमध्ये लोकशाहीचं तत्व नाही, ते लोकशाहीचं संरक्षण कसं करू शकतील? असा सवालही मोदींनी उपस्थित केला. विशेष म्हणजे काँग्रेस, आप, शिवसेनेसह एकूण १४ विरोधीपक्षांकडून मोदी सरकारने आयोजित केलेल्या संविधान दिनावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले, “स्वातंत्र्यानंतर संविधान दिवस साजरा करायला हवा होता. जेणेकरून पुढील पिढ्यांना संविधान कसं निर्माण झालं हे कळलं असतं. मात्र, हा संविधान दिन खूप उशिरा साजरा झाला. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव व्हावं हे ऐकण्यास देश तयार नाही. आजही बाबासाहेबांच्या कामाचं पुण्यस्मरण करण्याची इच्छा न होणं ही काळजीची बाब आहे.”

“जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारत एका संकटातून जातोय”

“जे पक्ष लोकशाही तत्व हरवले ते लोकशाहीचं संरक्षण कसं करू शकतील? जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात भारत एका संकटातून जात असल्याचं दिसतं. ते संकट म्हणजे घराणेशाही असलेले पक्ष,” असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला.

“एका कुटुंबातील एकापेक्षा अधिक लोक पक्षात येऊ नये असं नाही”

“काही राजकीय पक्ष हे काही कुटुंबांकडून काही कुटुंबांसाठी चालवले जातात. हे पक्ष लोकशाही आणि संविधानाच्या विरोधात आहेत. घराणेशाही असलेले पक्ष म्हणजे एका कुटुंबातील एकापेक्षा अधिक लोक पक्षात येऊ नये असं नाही, तर एखादा पक्ष अनेक वर्षे एका कुटुंबाकडून चालवला जाणे हे लोकशाहीसाठी संकट आहे. आपलं संविधान भ्रष्टाचाराला परवानगी देत नाही. न्यायालयाने एखाद्याला भ्रष्टाचाराची शिक्षा दिली असेल आणि त्यानंतरही राजकीय फायद्यासाठी त्यांचं गुणगान होत असेल तर देशातील तरुणांच्या मनात भ्रष्टाचाराच्या मार्गावर चालण्याला मान्यता मिळते,” असं मोदी यांनी सांगितलं.

हेही वाचा : “मोदींच्या दाढीत घरचं घर आहेत, एकदा झटकली की ५० लाख घरं पडतील” ; भाजपा खासदाराचं विधान!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“स्वातंत्र्यानंतर कर्तव्यांवर भर दिला असता तर बरं झालं असतं. कर्तव्य पालन केलं असतं तर अधिकार आपोआप मिळाले असते,” असंही मोदींनी नमूद केलं.