Pm Narendra Modi On Thalapathy Vijay Rally : तमिळ अभिनेता थलपती विजयच्या रॅलीत शनिवारी संध्याकाळी करूर येथे झालेल्या सभेत चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. या घटनेत तब्बल ३८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०० पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या नागरिकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आता राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत या चेंगराचेंगरीच्या घटनेवर प्रतिक्रिया देत दुःखद व्यक्त केलं आहे.

पंतप्रधान मोदींनी काय म्हटलं?

“तामिळनाडूतील करूर येथे राजकीय मिरवणुकीदरम्यान घडलेली घटना अत्यंत दुःखद आहे. या घटनेत ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या कुटुंबियांबद्दल मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. या कठीण काळात मी त्यांना मानसिक बळ मिळो अशी प्रार्थना करतो. जखमी लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो,” असं मोदींनी म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं?

तमिळ अभिनेता थलपती विजयने अभिनय क्षेत्र गाजवल्यानंतर आता राजकारणात प्रवेश केला आहे. तामिळनाडूच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थलपती विजयने मोठी तयारी सुरू केली असून त्या अनुषंगाने तामिळनाडूच्या विविध शहरांत रॅली काढण्यात येत आहे. दरम्यान, शनिवारी संध्याकाळी करूर या ठिकाणी रॅली काढण्यात आली होती. मात्र, याच रॅलीत चेंगराचेंगरीची घटना घटली. यामध्ये किमान ३८ जणांचा मृत्यू झाला असून १०० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विजयने तमिझगा वेत्री कळगम या पक्षाची स्थापना केलेली आहे. तामिळनाडूत होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून एक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. याच दरम्यान गर्दी अनियंत्रित झाल्याने चेंगराचेंगरी झाली. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने विजयने आपलं भाषण मध्येच थांबवलं.

थलपती विजयने काय म्हटलं?

“जी घटना घडली त्या घटनेमुळे मला अतीव वेदना झाल्या आहेत. माझ्या मनाला वेदना होत आहेत. मी माझ्या वेदना आणि शोक शब्दांमध्ये व्यक्त करु शकत नाही. करुरमध्ये ज्यांचा मृत्यू झाला त्या सगळ्या भावांना आणि बहिणींना मी आदरांजली वाहतो. मी त्यांच्या कुटुंबांबाबत सहानुभूती व्यक्त करतो.” असं म्हणत थलपती विजयने प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या एक्स पोस्टवर पोस्ट लिहून थलपती विजयने ही प्रतिक्रिया दिली आहे. विजयने जखमींना लवकर बरं वाटावं आणि आराम पडावा म्हणून आपण देवाकडे प्रार्थना करत असल्याचंही म्हटलं आहे. लवकरात लवकर सगळ्या जखमींना बरं वाटेल अशी आशा आहे असंही त्याने म्हटलं आहे.