पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमात जनतेशी संवाद करताना एका ह्रदयविकार रुग्णाला मला सत्तेत राहण्याच्या शुभेच्छा देऊ नका, असं मत व्यक्त केलं. राजेश कुमार प्रजापती या रुग्णाने मोदींचं आयुष्यमान भारत योजनेसाठी कौतुक करताना त्यांना कायम सत्तेत राहण्याच्या शुभेच्छा दिल्या. यावर बोलताना मोदींनी हे मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी मी आजही सत्तेत नाही आणि भविष्यातही सत्तेत जायची इच्छा नाही, असंही नमूद केलं. राजेश कुमार प्रजापती म्हणाले, "तुमचं आयुष्य इतकं मोठं असो की कायम सत्तेतच राहो. माझ्या कुटुंबातील लोकही तुमच्यावर खूप खूश आहेत." यावर मोदी म्हणाले, "राजेशजी तुम्ही मला सत्तेत राहण्याच्या शुभेच्छा देऊ नका. मी आजही सत्तेत नाही आणि भविष्यातही सत्तेत जायची इच्छा नाही. मला केवळ सेवेत राहायचं आहे. माझ्यासाठी पंतप्रधान पद या सर्व गोष्टी सत्तेसाठी नाहीच, तर सेवेसाठी आहे." "माझं एक काम कराल का?" "लोकांना आयुष्मान भारत योजनेची माहिती नसते. तुमच्या आजूबाजूला जितके गरीब कुटुंब आहेत त्यांना तुम्हाला आयुष्मान भारत योजनेची कशी मदत झाली याची माहिती द्या. तसेच त्यांनाही असं कार्ड बनवण्यास सांगा. जेणेकरून त्यांच्या कुटुंबात काही संकट आलं तर त्यांना मदत होईल. आज गरीबाला औषधांशिवाय अडचण यावी हे योग्य नाही. पैशांमुळे गरीबांना औषधं घेता न येणं किंवा उपचार न मिळणं ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे अशा गरीबांना मदत करा आणि घराघरात ही माहिती द्या," असंही मोदी यांनी सांगितलं. "पंचायतीपासून संसदेपर्यंत सर्वत्र अमृत महोत्सवाचाच गाजावाजा" नरेंद्र मोदी म्हणाले, "अमृतमहोत्सव (Amrit Mahotsav) हा शिकण्यासोबतच देशासाठी काहीतरी करण्याचीही प्रेरणा देतो आणि आता तर देशभरातील सामान्य जनता असो वा सरकारे असो, पंचायतीपासून संसदेपर्यंत सर्वत्र अमृत महोत्सवाचाच गाजावाजा सुरू आहे आणि या उत्सवाशी जोडलेले कार्यक्रम सतत सुरू आहेत. येत्या १६ डिसेंबर रोजी आपला देश १९७१ च्या युद्धाचे स्वर्ण जयंती वर्ष साजरे करत आहे. या सर्व दिनविशेषांनिमित्त मी देशाच्या संरक्षण दलांचे स्मरण करतो, आपल्या वीरांचे स्मरण करतो आणि विशेष म्हणजे अशा वीरांना जन्म देणाऱ्या वीर मातांचे स्मरण करतो." हेही वाचा : Mann Ki Baat : आरोग्य कर्मचारी लसीकरणात कोणतीही उणीव ठेवणार नाही हे माहिती होतं : मोदी "आपल्या आजूबाजूला जे नैसर्गिक स्रोत आहेत, ते आपण जपले पाहिजेत, त्यांना पुन्हा मूळ स्वरूपात आणले पाहिजे. यातच आपल्या सर्वांचे हित आहे, जगाचे हित आहे. जेव्हा आपण निसर्गाचे रक्षण करतो, त्या बदल्यात निसर्गही आपले संरक्षण करतो, आपल्याला सुरक्षा प्रदान देतो. अनेकदा वैयक्तिक आयुष्यातही आपल्याला हे अनुभवता येते," असंही मोदींनी नमूद केलं.