उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार घटनेवरुन संपूर्ण देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेची दखल घेतली असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. योगी आदित्यनाथ यांनीच ट्विट करत ही माहिती दिली आहे. नरेंद्र मोदींनी आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यास सांगितलं असल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.
योगी आदित्यनाथ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्यासोबत हाथरस घटनेवरुन संवाद साधवा. आरोपींविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे असं यावेळी त्यांनी सांगितलं”. योगी आदित्यनाथ यांनी घटनेचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आलं असल्याची माहिती दिली.
आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी ने हाथरस की घटना पर वार्ता की है और कहा है कि दोषियों के विरुद्ध कठोरतम कार्रवाई की जाए।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) September 30, 2020
योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हाथरस सामूहिक बलात्कारातील आरोपींना सोडलं जाणार नाही. घटनेचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आलं आहे. हे पथक सात दिवसांत रिपोर्ट सादर करेल. न्याय मिळावा यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होईल”.
हाथरस में बालिका के साथ घटित दुर्भाग्यपूर्ण घटना के दोषी कतई नहीं बचेंगे।
प्रकरण की जांच हेतु विशेष जांच दल का गठन किया गया है। यह दल आगामी सात दिवस में अपनी रिपोर्ट देगा।
त्वरित न्याय सुनिश्चित करने हेतु इस प्रकरण का मुकदमा फास्ट ट्रैक कोर्ट में चलेगा।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) September 30, 2020
आणखी वाचा- Hathras Gangrape: यूपी सरकारकडून तपासासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना
बलात्कार पीडित १९ वर्षीय पीडितेचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात पीडित तरुणीवर उपचार सुरु होते. मध्यरात्री ३ वाजता पीडित तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. युपी पोलिसांनी जबरदस्ती अंत्यसंस्कार केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांना वारंवार मृतदेह घरी आणला जावा यासाठी विनंती केली जात होती, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप कुटुंबाने केला आहे.
पीडितेच्या भावाने इंडियन एक्स्प्रेशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “माझ्या बहिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले असं दिसतंय. पोलीस आम्हाला काहीच माहिती देत नाहीयेत. अखेरचं एकदा तिचा मृतदेह घरी आणला जावा यासाठी आम्ही त्यांना वारंवार विनंती करत होतो, पण त्यांनी ऐकलं नाही”.
आणखी वाचा- उत्तर प्रदेशच्या ‘वर्ग-विशेष’ जंगलराजने आणखी एका तरूणीला मारले – राहुल गांधी
तरुणीच्या मृत्यूपूर्वी कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलं होतं की, १४ सप्टेंबर रोजी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी ही तरुणी आपल्या शेतात गेली होती. याठिकाणी चार तरुणांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेत जेव्हा ही तरुणी घटनास्थळी आढळून आली तेव्हा तिची जीभ छाटलेली होती तसेच तिच्या मानेवर गंभीर जखमा होत्या. त्याचबरोबर तिच्या पाठीच्या कण्यालाही गंभीर दुखापत झाली होती.
आणखी वाचा- “मला माझ्या मुलीचा चेहराही पाहू दिला नाही”; हाथरस पीडितेच्या वडिलांनी व्यक्त केली हतबलता
याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला फक्त जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर २३ तारखेला तरुणीच्या जबाबानंतर एफआयआरमध्ये सामूहिक बलात्काराचे कलम जोडण्यात आले. पोलिसांनी पीडित मुलीच्या घराजवळील तीन व्यक्तींना सुरुवातीला ताब्यात घेतले. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यातील एकजण फरार झाला होता त्यानंतर त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
