काराकाट (बिहार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दहशतवादाची तुलना सापाशी केली. ‘जर त्याने पुन्हा डोके वर काढले तर त्याला बिळातून बाहेर काढून ठेचले जाईल’, असा इशारा त्यांनी दिला. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधारांचे पाकिस्तानातील तळ भारतीय सशस्त्र दलांनी उद्ध्वस्त केल्याचा पुनरूच्चारही मोदी यांनी केला.

बिहारच्या राजधानीपासून सुमारे १४० किमी अंतरावर असलेल्या काराकाट येथे एका सभेत संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, की ‘ऑपरेशन सिंदूर’ हे फक्त बाणावरील टोक आहे. दहशतवादाविरुद्धची लढाई अद्याप थांबवलेली नाही आणि ती संपलेली नाही, असेही त्यांनी या वेळी नमूद केले. गेल्या महिन्यात मधुबनी जिल्ह्यातील झालेल्या सभेची आठवण करून देताना मोदी म्हणाले, की ‘पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मी बिहारला आलो होतो. पहलगाम हल्ल्यात अनेक बहिणींनी त्यांचे पती गमावले होते. मी वचन दिले होते की गुन्हेगारांना अशी शिक्षा मिळेल, ज्याची ते स्वप्नातही कल्पना करू शकत नाहीत. आज, वचन पूर्ण केल्यानंतर मी बिहारला परतलो.’

‘देशातील भगिनींच्या ‘सिंदूर’ची ताकद पाकिस्तानसह संपूर्ण जगाने अनुभवली. दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कराच्या आश्रयाखाली सुरक्षित वाटत असेल. परंतु आम्ही त्यांना गुडघे टेकवालयाला भाग पाडले. आम्ही पाकिस्तानची हवाई तळ आणि लष्कराची महत्त्वाची ठिकाणी उद्ध्वस्त केली. हा नवीन भारत आहे आणि त्याची ताकद सर्वांनी पाहिली,’ असे मोदी म्हणाले.

धमकी देणारा अटकेत

भागलपूर : बिहारच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाला भागलपूर जिल्ह्यातून अटक केल्याची माहिती शुक्रवारी पोलिसांनी दिली. सुलतानगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महेशी गावातून गुरुवारी सायंकाळी आरोपीला अटक करण्यात आली, असे एका अधिकृत निवेदनात पोलिसांनी म्हटले आहे. एका व्हॉट्सअपद्वारे सुरक्षा यंत्रणांना फोन करून आरोपीने मोदींना जिवे मारण्याची धमकी दिली होती.

उत्तर प्रदेशात १५ प्रकल्पांचे उद्घाटन

कानपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कानपूर येथे ४७ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या १५ विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. मोदी यांच्या हस्ते कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या चुन्नीगंज ते कानपूर सेंट्रल या नवीन भूमिगत स्थानकाचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी घाटमपूर येथे तीन ६६० मेगावॅट क्षमतेच्या वीज आणि पंकी येथे एका औष्णिक वीज प्रकल्पाचे उद्घाटन, तसेच पंकी वीज प्रकल्पापासून कल्याणपूरपर्यंत दोन नवीन रेल्वेपुलांचेही उद्घाटन केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहलगाम पीडित कुटुंबीयांशी चर्चा

कानपूर : पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या ३१ वर्षीय शुभम द्विवेदी यांच्या कुटुंबाची चकेरी विमानतळावर भेट घेतली. ‘ही भेट खूप भावनिक होती,’ असे शुभमचे चुलत भाऊ सौरभ द्विवेदी म्हणाले. भेटीदरम्यान पंतप्रधानही भावुक झाले आणि त्यांनी सरकारच्या पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले, असे सौरभ यांनी पुढे सांगितले. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी शुभम याचा विवाह झाला होता. तो कुटुंबासह पहलगाम येथे पर्यटनासाठी गेला होता.