राजधनी दिल्लीतील एका फॅक्ट्रीला आज सकाळी भीषण आग लागल्याची घडली. यामध्ये आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी आहेत. शिवाय अनेकांना वाचवण्यात यश आले आहे. आगीत होरपळलेल्यांना तातडीने रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे, मात्र त्यामधील काहींची परिस्थिती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयाच्यावतीने पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीतून या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांसाठी दोन लाख रुपये तर गंभीर जखमींसाठी ५० हजार रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आलेली आहे.

दरम्यान या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी. दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवंद केजरीवाल यांनी दुःख व्यक्त केले आहे.

दिल्लीत लागलेल्या आगीची घटना प्रचंड वेदनादायी आणि दुःखद आहे. आगीत जीव गमावलेल्यांच्या नातेवाईकांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींनी लवकरात लवकर बरं व्हावं. तात्काळ मदत पोहचावी असे निर्देश सर्व यंत्रणांना दिले आहेत. असं पंतप्रधान मोदी यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

आणखी वाचा- दिल्लीतील अग्नितांडव : घटनेची न्यायालयीन चौकशी; मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत

मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या भीषण आगीत गंभीर भाजलेल्यांना सफदरजंग आणि एलएनजेपी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी चौकशीचे आदेश दिले असून, दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले. याचबरोबर दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखांची तसेच जखमींना एक लाख रुपयांची आर्थिम मदत घोषित केली आहे. शिवाय या दुर्घटनेतील सर्व जखमींवर सरकारच्यावतीने उपचार केले जातील असे देखील त्यांनी स्पष्ट केले.