पीटीआय, नवी दिल्ली लडाखमधील देपसांग भागात चीनने निवारे उभारल्याचे वृत्त निदर्शनास आणत काँग्रेसने सवाल केला आहे की, याप्रकरणी सरकारने मौन का बाळगले आहे? त्या भागात एप्रिल २०२० ची स्थिती कायम राखण्याबाबत सरकारने काय प्रयत्न केला, अशी विचारणाही काँग्रेसने केली आहे.गेल्या महिन्यात इंडोनेशियात झालेल्या जी-२० परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग यांच्याशी हस्तांदोलन केल्याबद्दलही काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी टीका केली आहे. काँग्रेसच्या या टीकेवर सरकारने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. चीनबरोबर असलेला सीमावाद हाताळण्यावरून काँग्रेसने सरकारवर आरोप केले असले तरी, सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, अलीकडील काळात सीमाभागातील पायाभूत सुविधांत मोठी सुधारणा केली आहे.दरम्यान माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, चीनने देपसांग भागात तापमान नियामक निवारे उभारले आहेत. तेथे चीनचे सैनिक कायमस्वरूपी तैनात ठेवण्यासाठी या निवाऱ्यांचा उपयोग होईल, असे श्रीनेत यांनी शनिवारी अखिल भारतीय काँग्रेस मुख्यालयातील पत्रकार परिषदेत सांगितले.चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताच्या हद्दीत १५ ते १८ किलोमीटर आत असे दोनशे निवारे उभारल्याचा दावा त्यांनी संबंधित वृत्ताच्या हवाल्याने केला.