दिल्लीतील रामलीला मैदानावर झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायद्यावरून शरसंधान केलं. काँग्रेससह विरोधीपक्ष लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. एनआरसीमधून वगळण्यात आलेल्या लोकांसाठी केंद्र सरकार छावण्या उभारत असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत, असा आरोप मोदी यांनी केला. त्यावर प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांनी एका छावणीच्या कामाचा फोटो शेअर करून उत्तर दिलं आहे.
रामलीला मैदानावरून अप्रत्यक्षरीत्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचे रणशिंग फुकताना मोदी म्हणाले, “विरोधकांकडून एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात अफवा पसरवल्या जात आहे. सरकार छावण्या सुरू करणार आहे, असं सांगितलं जात आहे. पण, भारतीय मुस्लिमांना घाबरण्याची गरज नाही. अर्बन नक्षलवादीही खोटी माहिती पसरवत आहेत. एनआरसीमधून वगळण्यात येणाऱ्या लोकांसाठी केंद्र सरकार देशात छावण्या उभारणार असल्याचं सांगितलं जात आहे. निवडणुकीत जनतेनं नाकारल्यानंतर विरोधकांकडून जुनं अस्त्र बाहेर काढण्यात आलं. काही जणांकडून गांधी आडनावाचा फायदा घेतला जात आहे,” असं मोदी म्हणाले.
Modi said that there is no detention centre being planned for those left out of NRC. This is a huge detention centre (for 3000 detenues) being built in Assam which I visited a month ago pic.twitter.com/OpHDJz09kL
— Prashant Bhushan (@pbhushan1) December 22, 2019
मोदी यांच्या भाषणानंतर प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांनी आसाममध्ये तीन हजार लोकांसाठी उभारण्यात येत असलेल्या छावणीचा फोटो ट्विट केला आहे. “मोदी म्हणतात की, एनआरसीमधून ज्यांना वगळण्यात येईल, त्यांच्यासाठी कुठेही छावण्या उभारण्याचं नियोजन नाही. पण, ही पहा तीन हजार माणस राहु शकतील अशी छावणी. ही छावणी आसाममध्ये उभारली जात असून, महिनाभरापूर्वी मी या छावणीला भेट दिली आहे,” असं भूषण यांनी म्हटलं आहे.