Prashant Kishor on Rahul Gandhi : जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी गुरूवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी राहुल गांधी दिल्लीत बसून बिहारी लोकांची थट्टा करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी बिहारच्या कोणत्याही गावात एक रात्र घालवून दाखवावी असे आव्हान देखील दिले आहे. या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमूवर सध्या बिहारच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत.

प्रशांत किशोर यांनी वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, “राहुल गांधी बिहारमध्ये येत-जात असतात, मात्र प्रत्यक्षात कोणताही दौरा करत नाहीत. जर राहुल गांधींनी कधी बिहारच्या एखाद्या गावात रात्र घालवली असेल, तर मला सांगा सांगावे. जर ते कोणत्याही गावात एक रात्र जरी घालवू शकले तर आम्ही हे स्वीकार करू.” किशोर पुढे बोलताना म्हणाले की, “तुम्ही दिल्लीत बसून बिहारी लोकांवर हसता, आणि पुन्हा इथे आम्हाला उपदेश द्यायला येता.”

बिहारमधून आलेल्या नागरिकांबद्दल तेलंगानाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केलेल्या विधानाचा देखील प्रशांत किशोर यांनी समाचार घेतला आणि त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. तसेच त्यांनी काँग्रेसने बिहारच्या लोकांची वर्षानुवर्ष उपेक्षा आणि अनादर केल्याचा आरोप केला.

प्रशांत किशोर म्हणाले, “तेलंगानामध्ये रेवंत रेड्डी मुख्यमंत्री आहेत. त्यांना मुख्यमंत्री पदावर येऊन दोन वर्ष झाली. त्याच्या आधी ते टीडीपीमध्ये होते आणि त्याच्या आधी आरएसएस आणि भाजपामध्ये हो. मुख्यमंत्री बनल्यावर त्यांनी जाहीरपणे म्हटले की मजूरी करणे बिहारी लोकांच्या डीएनएमध्ये आहे. बिहारी मजूरी करण्यासाठी जन्माला आले आहेत.”

किशोर पुढे बोलताना म्हणाले की, “त्यांनी असे का म्हटले? कारण त्यांचे विरोधक केसीआरचे बहुतेक अधिकाऱ्यांची पार्श्वभूमी बिहारची आहे. यामुळे त्यांचे म्हणणे होते की तेलंगाना वाईट स्थितीत आहे, कारण बिहार त्याला चालवत आहे.”

प्रशांत किशोर यांची काँग्रेसवर टीका

किशोप काँग्रेसवर टीका करताना म्हणाले की, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८९ मध्ये बिहारसाठी ५०,००० कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती आणि म्हणाले होते की बिहारला विकासाचे केंद्र बनवू, पण हा निधी कधीच वितरीत करण्यात आला नाही.

पुढे त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “तो पैसा कुठे गेला? त्यानंतरही काँग्रेस सत्तेत होती, आम्हाला सांगा तुम्ही बिहारसाठी काय केलं?”

बिहारमध्ये फक्त जात हा एकमेव फॅक्टर नाही

प्रशांत किशोर म्हणाले की, बिहारच्या निवडणुकीत जात हा एकमात्र फॅक्टर नाही आणि यासाठी त्यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशाचे उदाहरण दिले.

ते म्हणाले की, “बिहारमध्ये गेल्या १५ वर्षांपासून भाजपाला लोकसभा निवडणुकीत बऱ्यापैकी यश मिळत आहे. अनेकांचे म्हणणे आहे की भाजपाला यश मिळत नाहीये तर ते पीएम मोदींच्या नावावर मत दिले जात आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तुम्ही म्हणालात की बिहारमध्ये प्रत्येक व्यक्ती जातीवर आधारित राजकारणावर मत देतो आणि बिहारमध्ये मोदीच्या नावावर मते दिला जात आहेत असे तुम्ही म्हणता. तर मला सांगा बिहारमध्ये मोदींच्या जातीचे किती लोक राहतात ? जर ते राहत नसतील तर त्यांनी मोदींना मत कसे दिले? जर प्रत्येक व्यक्ती जातीच्या आधारावर मत देत आहे तर आम्हाला सांगा की बिहारमध्ये पीएम मोदींना कोणी मत दिलं? कारण बिहारमध्ये मोदींच्या जातीचं कोणीही नाही.”