Deportation Of Indians From US : पुन्हा एकदा अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे. यामध्ये बेकायदेशीररित्या अमेरिकेत गेलेल्या भारतीयांना मायदेशी पाठवण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. दरम्यान काल अमेरिकेतून १०४ भारतीयांना लष्करी विमानातून माघारी पाठवले आहे.

दरम्यान या मायदेशी आलेल्या या १०४ भारतीयांमध्ये पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातील ठाकरवाल गावातील ४१ वर्षीय रकिंदर सिंग यांचाही समावेश आहे. ज्याच्याकडून एका ट्रॅव्हल एजंटने त्याला कायदेशीररित्या अमेरिकेत पोहचवण्यासाठी तब्बल ४५ लाख रुपये घेतले होते. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पंजाबहून अमेरिकेचा प्रवास सुरू केल्यानंतर सहा महिन्यांनी, रकिंदर अमेरिकेत बेकायदेशीरपणे पोहचला होता. आता हद्दपार झालेल्या १०४ भारतीयांमध्ये रकिंदर सिंगचाही समावेश आहे. ज्या ट्रॅव्हल एजंटने रकिंदर यांना अमेरिकेत कायदेशीररित्या पोहचवण्याचे वचन दिले होते, तो दुबईचा असून, त्याने साबू या नावाने आपली ओळख सांगितली होती.

दरम्यान रकिंदर यांच्या या अमेरिका प्रवासादरम्यान त्याला अनेक प्रवासी भेटले. तेव्हा त्यांना धक्कादायक माहिती मिळाली. ज्या एजंटने रकिंदर यांना त्याचे नाव साबू असल्याचे सांगितले होते, त्याने इतर काहींना त्याचे नाव राजू, लिओ असल्याचे सांगितले होते. तो वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी नावे सांगून त्यांना अमेरिकेत सुरक्षित प्रवेश देण्याचे आश्वासन द्यायचा. असे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

एजंटकडून पासमोर्ट जप्त

या प्रकरणी अधिक माहिती देताना रकिंदर यांनी सांगितले की, “पंजाबीत बोलणाऱ्या साबूशी माझी कधीच भेट झाली नाही. इतकेच नव्हे तर मोबाइलवरही कधी त्याचा फोटो पाहिला नाही. तो फक्त वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून व्हॉट्सअॅप कॉलद्वारे बोलायचा. तो स्वतः पैसे घेण्यासाठी कधीच येत नव्हता. यासाठी तो त्याची माणसे पाठवत असे. आमचा अमेरिकेकडे प्रवास जसजसा पुढे जात होता तसतसे त्याचे लोक पंजाबमधील माझ्या कुटुंबाकडून हप्त्यांमध्ये पैसे गोळा करायचे. आम्ही ज्या ज्या देशात गेलो तिथे त्याचे लोक होते. आम्ही सीमेवर पोहोचण्यापूर्वी त्याने माझ्याकडून ४५ लाख रुपये घेतले होते. इतकेच नव्हे तर आम्ही भारतात परतू नये म्हणून त्याच्या माणसांनी आमचे पासपोर्टही जप्त केले होते.”

आयुष्याची कमाई गेली

सध्या जालंधरमध्ये राहणारे रकिंदर यांनी १२ वर्षे ऑस्ट्रेलियात काम केले आहे. ते विद्यार्थी व्हिसावर ऑस्ट्रेलियाला गेले होते. २०२० मध्ये भारतात परतल्यानंतर, त्यांनी आपल्या तीन मुलांच्या भविष्यासाठी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रकिंदर यांनी पुढे सांगितले की, “त्यांनी ऑस्ट्रेलियातील सर्व बचत खर्च करून ४५ लाख रुपये जमा केले. यासाठी त्यांनी कुटुंब आणि मित्रांकडून काही पैसे कर्ज म्हणून घेतले. पण ते ब्राझीलला पोहोचताच, एजंटच्या मध्यस्थांनी त्यांचे पासपोर्ट काढून घेतले.” अमृतसर ते अमेरिका-मेक्सिको सीमेपर्यंतचा त्याचा प्रवास सहा महिन्यांचा होता, परंतु शेवटी त्यांना अमेरिकेतून व्हावे लागले.