Raghuram Rajan in Bharat Jodo Yatra: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सहभाग घेतला. राजस्थानमध्ये राहुल गांधींची ही यात्रा पोहोचलेली असता राजन काही अंतर या यात्रेमध्ये राहुल गांधींबरोबर चालले. राजस्थानमधील सवाई माधवपूर येथील भदोईमधून राहुल गांधींच्या आजच्या भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली.

“भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधींबरोबर चालताना आरबीआय़चे माजी गव्हर्नर रघुराम राजन”, अशा कॅप्शनसहीत राहुल गांधी आणि रघुराम राजन यांचा फोटो काँग्रेसच्या ट्वीटर हॅण्डलवरुन शेअर करण्यात आला आहे. “नफरत के खिलाफ देश जोड़ने के लिए खड़े होने वालों की बढ़ती संख्या बताती है कि- हम होंगे कामयाब,” असंही हा फोटो शेअर करताना म्हटलं आहे.

रघुराम राजन यांनी यापूर्वी अनेकदा केंद्रातील मोदी सरकारच्या आर्थिक आणि सामाजिक धोरणांवर टीका केलेली आहे. भारताचा विकास हा मुक्त लोकशाहीला अधिक पाठबळ देण्यामध्ये आणि आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेल्या संस्थांना सामर्थ्यवान बनवण्यामध्ये आहे, असं राजन सांगतात. राजन हे मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयावर उघडपणे टीका करणाऱ्या प्रमुख तज्ज्ञांपैकी एक आहेत. “आर्थिक विकास मंदावण्यासाठी हा राजकीय आणि सामाजिक अजेंडा” कारणीभूत ठरला असं राजन यांनी यापूर्वी म्हटलं आहे. यावरुन भारतीय जनता पार्टीने कठोर शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवलेली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रघुराम राजन यांनी भारत जोडो यात्रेला हजेरी लावणं हे अनेकांना आश्चर्याचकित करणारं ठरलं नाही. या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस समविचारी व्यक्तींना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील समविचारी व्यक्तींना ‘देश एकत्र करण्यासाठी’ एकत्र आणण्याचा हा प्रयत्न असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे.