गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाहनताफ्यावर दगडफेक करणाऱ्या भाजपच्या स्थानिक नेत्याला पोलिसांनी आज धनेरा येथून अटक केली आहे. जयेश दर्जी असं या नेत्याचं नाव असून तो बनासकांठाचा भाजपचा जिल्हा महामंत्री आहे. तसंच इतर तिघांना ताब्यात घेतलं आहे. दर्जी हा या घटनेतील मुख्य आरोपी असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तत्पूर्वी राहुल गांधींच्या कारवरील हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभरात ठिकठिकाणी निदर्शनं केली.

बनासकांठा येथे कारवर झालेल्या हल्ल्याच्या मागे भाजप आणि आरएसएसचा हात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी आज केला होता. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला होता. ज्यांनी हल्ले घडवून आणले तेच या हल्ल्याचा निषेध कसा करतील, असा आरोप त्यांनी मोदींवर केला होता. मोदी आणि आरएसएस-भाजपची राजकारणाची हीच पद्धत आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती. नरेंद्र मोदींच्या नावानं घोषणाबाजी, आम्हाला काळे झेंडे दाखवणे, दगडफेक करणे आदी प्रकार केल्यानं आम्ही मागे हटणार नाही. आम्ही पूर्ण ताकदीनं पूरग्रस्तांना मदत करू, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.

काय आहे प्रकरण:

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे शुक्रवारी पूरग्रस्त गुजरातच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांना काही लोकांनी काळे झेंडे दाखवले होते. तसंच त्यांच्या वाहनताफ्यावर दगडफेकही करण्यात आली होती. भाजपच्या कार्यकर्त्यांनी कारवर दगडफेक केल्याचा आरोप काँग्रेसनं केला होता. दगडफेक केल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोदी-मोदी अशा घोषणाही दिल्याचा दावा करण्यात आला होता. भाजपच्या गुंडांनी राहुल गांधींच्या कारवर हल्ला केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला होता. दरम्यान, या घटनेनंतर आज देशभरात ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध केला.