Rahul Gandhi On Pahalgam Attack: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना शहीदांचा दर्जा देण्याची विनंती केली. ‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये, राहुल गांधी यांनी ते कुटुंबियांच्याबरोबर असल्याचे म्हटले आहे. याचबरोबर त्यांनी पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना शहीद म्हणून अधिकृत मान्यता देण्याच्या मागणीला पाठिंबा दिला.
“पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांना शहीदांचा दर्जा देण्याच्या मागणीला माझा पाठिंबा आहे. पंतप्रधानांना विनंती आहे की, त्यांनी या दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांच्या भावनांचा आदर करावा आणि त्यांना हा सन्मान द्यावा,” असे गांधी यांनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
उत्तर प्रदेशातील, रायबरेलीचे काँग्रेस खासदार असलेल्या राहुल गांधी यांनी बुधवारी कानपूरमध्ये पहलगाम हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेतली. याचबरोबर मृतांना शहीदांचा दर्जा द्यावा अशी मागणी केली होती.
मी पंतप्रधानांना सांगू इच्छितो…
“मी कानपूरमध्ये एका पीडिताच्या कुटुंबाला भेटलो. त्यांनी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदेश पाठवण्यास सांगितले. त्या सर्व कुटुंबांच्या वतीने, मी पंतप्रधानांना सांगू इच्छितो, “त्यांनी सांगितले आहे की आमची मुले शहीद झाली आहेत. आम्हाला वाटते की तुम्ही त्यांना शहीदांचा दर्जा द्यावा आणि त्यांचा आदर करावा,” असे राहुल गांधी बुधवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते.
राहुल गांधी यांनी कानपूरमध्ये शुभम द्विवेदी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळावा यासाठी विरोधी पक्ष संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत असल्याचे सांगितले.
पहलगाम हल्ला
२२ एप्रिल रोजी दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम खोऱ्यात झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यातील बहुतेक पर्यटक होते. पहलगाम या लोकप्रिय पर्यटन स्थळाजवळील एका कुरणात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला होता.
पाकिस्तानवर निर्बंध
दरम्यान दहशतवाद्यांना सतत पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी भारताने कठोर धोरण स्वीकारले आहे. सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बैठक झाल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानवर विविध निर्बंध लादले होते.
हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानी झालेल्या सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, “या दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य ओळखून, सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने काही निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये १९६० चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याच्या निर्यणाचा समावेश आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत राहील तोपर्यंत हा करार स्थगित राहील.”