Rahul Gandhi write to PM Modi : भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रविराम झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी, रविवारी दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्ष नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीले आहे. या पत्रात पंतप्रधान मोदी यांच्याकडे सध्याची परिस्थिती, ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम दहशतवादी हल्ला यावर चर्चेसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करण्यात आली आहे.
लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी त्यांच्या पत्रात म्हणाले की, “संसदेचे विशेष अधिवेशन तात्काळ बोलवण्यात यावे या विरोधकांच्या एकमताने करण्यात आलेल्या मागणीचा पुनरुच्चार ते करतात. पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि पहिल्यांदा अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष ट्र्म्प यांनी जाहीर केलेला आजचा शस्त्रविराम यावर चर्चा करावी हे लोकांसाठी आणि त्यांच्या प्रतिनिधींसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्यासमोर येणार्या आव्हानांना तोंड देण्यासाठीचा आपला सामूहिक निर्धार दाखवून देण्याची ही एक संधी असेल.” राहुल गांधी यांच्यासह राज्यसभेचे विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील एक वेगळे पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये त्यांनी राहुल गांधी यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.
यापूर्वी २८ एप्रिल रोजी दोन्ही नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी पत्र लिहिले होते.
पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर काँग्रेसने केंद्र सरकारच्या निर्णयांना अधिकृतपणे पूर्ण पाठिंबा जाहीर केला होता. पण आता पक्षातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता काँग्रेस पक्ष सध्याच्या परिस्थितीबाबात सरकारला प्रश्न विचारणे सुरू करेल. विशेषतः भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चर्चेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून सरकारला घेरले जाऊ शकते.
“भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाटाघाटींमध्ये कोणत्याही तिसर्या पक्षाचा हस्तक्षेप होणार नाही याची सरकारने नेहमीच काळजी घेतली आहे. मग ट्रम्प यांनी शस्त्रविरामाची घोषणा कशी केली? येत्या काळात आम्ही हे प्रश्न उपस्थित करू,” असे पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.
काँग्रेसकडून मागणी केली जात असतानाच राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी देखील सरकारला विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती केली आहे. “पंतप्रधानांना विनंती आहे की त्यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावावे आणि पहलगाम हल्ल्यापासून ते शस्त्रविराम याची तारीखेनुसार माहिती द्यावी,” असे ते म्हणाले आहेत.