कर्नाटक राज्यात पुढीलवर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने आजपासून बंगळुरूत इंदिरा कॅन्टीन सुरू केली आहे. या कॅन्टीनमधून ५ रूपयांत नाश्ता आणि १० रूपयांत जेवण मिळणार आहे. यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी बंगळुरूत आले होते. या कॅन्टीनच्या उद्घाटनप्रसंगी राहुल यांनी पाच मिनिटांचे भाषण केले. परंतु, आपल्या या छोटेखानी भाषणातही त्यांनी दोन मोठ्या चुका केल्या. सर्वांत प्रथम त्यांनी ‘इंदिरा कॅन्टीन’ ऐवजी ‘अम्मा कॅन्टीन’ असा उल्लेख केला. त्यानंतर या उपक्रमाचे कौतुक करताना अशा पद्धतीच्या कॅन्टीन बंगळुरूच्या इतर शहरांतही सुरू करणार असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थित नेत्यांचीही चांगलीच गोची झाल्याचे दिसून आले.
तत्पूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, या कॅन्टीनचा अभ्यास करून राज्यातील इतर शहरे व गावांमध्येही अशा पद्धतीच्या कॅन्टीन सुरू करण्यात येणार आहेत. आर्थिक वर्ष (२०१७-१८) बजेटमध्ये सर्व १९८ वॉर्डांत इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यात येणार आहे. ते म्हणाले, कर्नाटकला भूक मुक्त करण्याचे आमचे लक्ष्य आहे. दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी राज्यात प्रत्येक महिन्याला गरिबी रेषे खालील (बीपीएल) व्यक्तींना ‘अन्न भाग्य योजना’ अंतर्गत ७ किलो तांदूळ मोफत देण्यात येत आहे.
Karnataka: Congress VP Rahul Gandhi takes a meal at the newly inaugurated Indira Canteen in Bengaluru. pic.twitter.com/h0agD1V4o5
— ANI (@ANI) August 16, 2017
फिल्ड मार्शल मानकेशॉ परेड ग्राऊंडवर लोकांना संबोधित करताना तूरडाळही सवलतीत देण्यात येत असल्याचे सांगितले. स्तनपान करत असलेल्या माता आणि गर्भवती महिलांसाठी मातृपूर्ण योजनेतंर्गत दररोज माध्यान्ह भोजन देण्यात येणार आहे. दि. २ ऑक्टोबरपासून याचा विस्तार राज्यातील सर्व १२ लाखा अंगणवाड्यात करण्यात येणार असल्याचे सांगितले.