Jodha-Akbar Marriage Story: राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी नुकतंच सम्राट अकबराबाबत केलेलं एक विधान वादात सापडलं आहे. सम्राट अकबराचा विवाह जोधाबाई यांच्याशी झाल्याचा दावा आत्तापर्यंत केला जात होता. यावर एक आख्खा चित्रपटदेखील बॉलिवुडमध्ये प्रदर्शित झालेला आहे. पण हरिभाऊ बागडेंनी हे धादांत खोटं असल्याचा दावा केला आहे. एवढंच नाही, तर सम्राट अकबराच्या कारकिर्दीचा इतिहास सांगणाऱ्या ‘अकबरनामा’चा दाखला बागडे यांनी यासाठी दिला आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरून नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
काय म्हणाले हरिभाऊ बागडे?
राजस्थानच्या उदयपूरमध्ये प्रताप गौरव केंद्रातर्फे महाराणा प्रताप यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला अर्थात बुधवारी संध्याकाळी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हरिभाऊ बागडे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी ब्रिटिश इतिहासकारांनी भारतीय इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप केला. तसेच, भारतीय महापुरुषांना सम्राट अकबरापेक्षा दुय्यम स्थान दिल्याचंही ते म्हणाले.
“ब्रिटिश इतिहासकारांनी आपल्या महापुरुषांचा इतिहासच बदलून टाकला. त्यांनी हा इतिहास व्यवस्थित लिहिलाच नाही. पण त्यांनी लिहिलेल्या इतिहासालाच सुरुवातीच्या काळात मान्यता मिळाली. भारतीय इतिहासकारांनीदेखील नंतरच्या काळात हाच इतिहास कोणतीही खातरजमा न करता प्रमाण मानला”, असं बागडे म्हणाले.
सम्राट अकबराचा विवाह नेमका कुणाशी?
अकबराचा विवाह जोधाबाईशी झाल्याचा दावा हरिभाऊ बागडेंनी यावेळी बोलताना फेटाळून लावला. “असं म्हटलं जातं की अकबर आणि जोधा यांचा विवाह झाला होता. यावर एक चित्रपटही बनवण्यात आला. इतिहासाच्या पुस्तकांमध्येही असंच म्हटलं आहे. पण ते खोटं आहे. अकबराची पत्नी ही कोणत्याही राजघराण्यातली नव्हती, तर दासीपुत्री होती. आमेरचा राजा भरमाल यानं जरी हा संपूर्ण विवाह सोहळा आयोजित केला असला, तरी तो राजा भरमालच्या मुलीशी झालेला नाही. ‘अकबरनामा’मध्येदेखील जोधाबाईचा कोणताही उल्लेख नाही”, असं हरिभाऊ बागडे यांनी नमूद केलं.
काय आहे आमेर पॅलेसमधी विवाहाचा प्रचलित इतिहास?
सध्याच्या जयपूरजवळच १६व्या शतकात आमेर राज्य अस्तित्वात होतं. कछवाहा राजपुतांचं इथे राज्य होतं. इथला राजा भरमाल याच्या मुलीशी धोरणात्मक पाऊल म्हणून सम्राट अकबरानं १५६९ साली विवाह केल्याचे दावे केले जातात. या मुलीचा उल्लेख अनेक ठिकाणी हरका बाई किंवा मरियम-उझ-झमानी असल्याचंही सांगितलं जातं. पण याच मुलीचं नाव जोधा बाई असल्याचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळून येतो. यावरच हरिभाऊ बागडेंनी आक्षेप घेतला असून ब्रिटिश इतिहासकारांनी चुकीचा इतिहास सांगितल्याचा दावा त्यांनी केला आहे.
महाराणा प्रताप यांच्याबाबतचा ‘तो’ दावाही खोटा?
दरम्यान, हरिभाऊ बागडेंनी महाराणा प्रताप यांच्याविषयीचा एक दावाही असाच चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. राजपूत राजा महाराणा प्रताप यांनी तह करण्यासाठी सम्राट अकबराला पत्र लिहिलं होतं, असा दावा केला जातो. मात्र, हे पूर्णपणे चुकीचं असल्याचं बागडेंचं म्हणणं आहे. “महाराणा प्रताप यांनी कधीही स्वाभिमानाशी तडजोड केली नाही”, असं ते म्हणाले.