Rajnath Singh warn Pakistan Over terrorism : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातली संबंध तणावाचे बनले होते. या दहशतवादी हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन शिंदूर सुरू केले होते. या मोहिमेच्या यशानंतर आज पहिल्यांदाच देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे आज जमू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बदामी बाग छावणीतून लष्करांच्या जवानांना संबोधित केले. यावेळी सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले आहे.
राजनाथ सिंह म्हणाले की, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वाखाली ऑपरेशन सिंदूरदरम्यान तुम्ही जे काही केलं त्यावर संपूर्ण देशाला अभिमान आहे. मी जरी तुमचा संरक्षण मंत्री असलो तरी त्याच्या आधी मी भारताचा एक नागरिक आहे. संरक्षण मंत्री म्हणून तसेच भारताचा एक नागरिक म्हणून तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी येथे उपस्थित आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले. मी ती ऊर्जा अनुभवण्यासाठी आलो आहे, ज्याने शत्रूला उद्ध्वस्त केले. तुम्ही ज्या पद्धतीने सीमेपलीकडील पाकिस्तानच्या चौक्या आणि बंकर उद्ध्वस्त केले ते शत्रू विसरू शकत नाही, असेही संरक्षणमंत्री यावेळी म्हणाले.
ऑपरेशन सिंदूर फक्त एका मोहिमेचे नाव नाही, ही आमची प्रतिबद्धता आहे. ज्याद्वारे भारताने दाखवून दिले की आम्ही फक्त संरक्षण करत नाही, वेळ आल्यावर कठोर निर्णय देखील घेतो आणि कठोर कारवाई देखील करतो. हे ऑपरेशन प्रत्येक जवानाच्या डोळ्यातील स्पप्न होतं की, प्रत्येक दहशतवादी तळावर आम्ही पोहचू आणि शत्रूची छाती फाडून दहशतवादी तळांना उध्वस्त करूनच परत फिरू, असेही सिंह म्हणाले.
ऑपरेशन सिंदूर दहशतवादाविरोधात भारताकडून केलेली आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई आहे. ३५-४० वर्षांपासून भारत सीमेपलीकडून चालवल्याजात असलेल्या दहशतवादाचा समाना करत आहे. आज भारताने हे स्पष्ट केले आहे की भारत दहशतवादाविरोधात कोणत्याही टोकापर्यंत जाऊ शकतो.
त्यांच्या छातीवर वार केला
दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये दहशतवादी कारवाई करून भारताच्या मस्तकावर जखम करण्याचा प्रयत्न केला, भारताची सामाजिक एकता तोडण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांनी भारताच्या मस्तकावर वार केला, आपण त्यांच्या छातीवर वार केला. पाकिस्तानच्या जखमांचा इलाज यातच आहे की त्यांनी भारतविरोधीत आणि दहशतवादी संघटनांना आश्रय देणे बंद करावे आणि त्यांच्या भूमिचा वापर भारताच्याविरोधात होऊ देऊ नये, असेही राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले.
पाकिस्तानने भारताला धोका दिला
तुमच्या लक्षात असेल २१ वर्षांपूर्वी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्यासमोर इस्लामाबादने घोषणा केली होती की त्यांच्या भूमिवरून दहशतवाद एक्सपोर्ट केला जाणार नाही. पण पाकिस्तानने भारताला धोका दिला आहे आणि आजही धोका देत आहे. याची किंमत त्यांना मोजावी लागली आहे.
आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दात दहशतवादाविरोधातील भारताच्या भूमिकेची नव्याने व्याख्या केली आहे. ज्यानुसार भारताच्या जमिनीवर केलेला कोणताही दहशतवादी हल्ला ‘अॅक्ट ऑफ वॉर’ मानला जाईल. दोन्ही देशांमध्ये सध्या जे एकमत झाले आहे ते सीमेपलीकडून कोणतेही चुकीचे काम होणार नाही या आधारावरच झाले आहे. जर असं काही करण्यात आलं तर ‘बात निकलेगी तो बहुत दूर तलक जायेगी’, अशा शब्दात सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला. तसेच पंतप्रधानांना हेही स्पष्ट केलं आहे की दहशतवाद आणि चर्चा कधीही एकत्र होणार नाही आणि चर्चा झाली तर दहशतवाद आणि पाक व्याप्त काश्मीर यावर होईल, असेही सिंह यावेळी म्हणाले.