जम्मू -काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी शनिवारी बोलताना शेजारच्या देशांशी मैत्री करण्यावर भर दिला. त्यांनी कलम ३७० रद्द केल्याबद्दल भाजपला फटकारले. तसेच प्रभू श्रीराम हे फक्त हिंदूंचेच नसून संपूर्ण जगाचे असल्याचं म्हटलं. “प्रभू श्रीराम हे केवळ हिंदूंचे राम नाहीत. ते पूर्ण जगाचे राम आहे. भाजपाने त्यांना स्वत:चे बनवले आहे, जणू प्रभू राम फक्त त्यांच्यासाठीच आहे आणि इतर कोणासाठीही नाही. प्रभू राम हे फक्त भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच नाही तर संपूर्ण जगाचे आहेत, असे अब्दुल्ला म्हणाले.

दिवंगत उपपंतप्रधान देवीलाल यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त समारोहाला संबोधित करताना, हरियाणातील जिंद येथे इंडियन नॅशनल लोक दल आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्याच्या दोन वर्षानंतरही एकाही व्यक्तीला नोकरी मिळाली नाही. केंद्राने काश्मीरमध्ये ५० हजार नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. मात्र, तसं काहीच झालेलं नाही. त्यांनी भाजपावर केवळ धर्माच्या नावाखाली देशाचे विभाजन करण्याचा आणि खोटे बोलण्याचा आरोप केला.

“काश्मीर भारताचा भाग कधी नव्हता? आम्ही गांधींचा भारत निवडला, जिनांचा पाकिस्तान नाही. आम्ही म्हणालो की, आम्ही भारतात राहू आणि आम्ही भारतातच मरणार. जे लोक कलम ३७० रद्द करून भारताला बळकट केल्याचा दावा केला आहे, त्यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी भारताला कमकुवत केले आहे. ते लोक सर्वांशी खोटे बोलते. त्यामुळे त्यांना त्यांचे मार्ग बदलावे लागतील,” असंही अब्दुल्ला म्हणाले.

“अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते की आम्ही मित्र बदलू शकतो पण शेजारी नाही. आपण आपल्या शेजाऱ्यांशी भांडणं थांबवलं पाहिजे. जर तुम्ही तुमच्या शेजाऱ्याशी मित्र राहिलात तर तुम्ही समृद्ध व्हाल. आज आमचे मित्र कुठे आहेत? नेपाळ, भूतान किंवा बांगलादेश आपले मित्र आहेत का? आपण अफगाणिस्तानमध्ये ३ अब्ज डॉलर्स खर्च केले. आज अफगाणिस्तान आपला मित्र आहे का? लहान भावाला सोबत घेतल्यासच घर समृद्ध होईल, हे मोठ्या भावाला हे समजले असंही अब्दुल्ला म्हणाले.

यावेळी अब्दुल्ला यांनी तीन कृषी कायद्यांवरून केंद्रावर टीका केली. “केंद्र सरकार उद्योगपतींच्या ताब्यात आहे आणि म्हणून त्यांना शेतकऱ्यांचा बळी द्यायचा आहे”, असं ते म्हणाले.