बलात्काराच्या वाढत्या घटनांवर बोलताना भाजपा खासदार राम प्रसाद शर्मा यांनी संताप व्यक्त करत अशा आरोपींना भरचौकात गोळी घातली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. भरचौकात गोळी घालणे हाच यावरील एकमेव उपाय असल्याचं ते बोलले आहेत. राम प्रसाद शर्मा आसाममधील तेजपूरचे खासदार आहेत. काही दिवसांपुर्वी एका चिमुरडीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याच्या घटनेवर बोलताना संतापाच्या भरात त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, ‘अशा लोकांच्या मनात बलात्कारासंबंधी भय तेव्हाच निर्माण होईल, जेव्हा त्यांना सर्वांसमोर फासावर लटकवलं जाईल आणि नंतर गोळी घातली जाईल’. ‘बलात्कार करणारा अल्पवयीन असो अथवा प्रौढ, त्याला फाशी अथवा गोळी घालण्याची शिक्षा झालीच पाहिजे’, असंही ते पुढे म्हणाले आहेत.

‘जर कोणी अल्पवयीन बलात्कारासारखा भयंकर गुन्हा करत असेल, तर मग फक्त अल्पवयीन आहे म्हणून त्याला सूट का देण्यात यावी’, असा सवाल राम प्रसाद शर्मा यांनी यावेळी विचारला. त्यालादेखील जास्तीत जास्त शिक्षा मिळाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. ‘जोपर्यंत बलात्का-यांना कठोरातील कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत लोकांच्या मनात भीती निर्माण होणार नाही. जोपर्यंत भय निर्माण होत नाही तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत’, असंही राम प्रसाद शर्मा यांनी म्हटलं आहे.

‘बलात्काराच्या आरोपींचा खात्मा करण्यासाठी शुटिंग स्क्वॉड असलं पाहिजे. ज्यांचं काम बलात्का-यांना गोळ्या घालण्याचं असेल’, असं मत त्यांनी व्यक्त केलं. याचवेळी त्यांनी महिलांची छेड काढणा-यांना किमान १० वर्षांची शिक्षा झाली पाहिजे असंही म्हटलं. शिक्षा देताना अल्पवयीन आणि प्रौढ असा भेदभाव होता कामा नये असं ते यावेळी बोलले आहेत.