पंजाब आणि महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) खातेधारकांसाठी दिलासादायक बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने ‘पीएमसी’ बँकेच्या खातेधारकांसाठी खात्यातील पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे. आता या बँकेचे खातेधारक सहा महिन्यांच्या कालावधीत ४० हजार रुपयांपर्यंत रक्कम काढू शकतात. या अगोदर पैसे काढण्याची मर्यादा २५ हजार रुपये होती.
याप्रकरणी ईडीने ‘एचडीआयएल’चे संचालक, प्रवर्तक यांच्यासह पीएमसी बँकेच्या अधिकाऱ्यांची तब्बल ३ हजार ८३० कोटींची मालमत्ता जप्त केलेली आहे.
RBI enhances withdrawal limit for PMC Bank depositors to Rs 40,000
Read @ANI Story | https://t.co/kl33bm8w6l pic.twitter.com/RD8TOnRu38
— ANI Digital (@ani_digital) October 14, 2019
मुंबईतील पीएमसी बँकेतील ४ हजार ३०० कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाल्यानंतर आरबीआयकडून येथील खातेधारकांवर पैसे काढण्यासाठी निर्बंध लादण्यात आले होते. सुरूवातीस तर हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, याप्रकारामुळे प्रचंड संतप्त झालेल्या खातेधारकांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर व हा मुद्दा सर्वत्र उचलल्या गेल्याने पैसे काढण्याची मर्यादा हळूहळू वाढवल्या जात असल्याचे दिसत आहे.
यापूर्वी पीएमसी बँकेच्या खातेधारकांनी अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्यासमोर आपले पैसे परत मिळावेत यासाठी निषेध आंदोलनही केले आहे. १० ऑक्टोबर रोजी जेव्हा सीतारामन मुंबईतील भाजपाच्या कार्यालयात होत्या त्यावेळी पीएमसी बँकेच्या खातेधारकांच्या एका गटाने सीतारामन यांची भेट घेतली होती.
दरम्यान, पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी पोलिसांनी आज यातील तीन आरोपी राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि वारयाम सिंह यांना न्यायालयामोर हजर केले होते. न्यायालयाने या सर्व आरोपींना १६ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
याचबरोबर ‘पीएमसी’ घोटाळाप्रकरणी बँकेच्या खातेधारकांच्या हिताचे रक्षण केले जाईल असा विश्वास आज पुन्हा एकदा आरबीआयच्या गव्हर्नरांनी आपल्याला दिल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. या प्रकरणाचे लवकरात लवकर निराकारण केले जाईल, असेही स्पष्ट करत सीतारामन यांनी खातेधारकांना पुन्हा दिलासा देण्याचा प्रयत्न केला.