नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात दहा दिवस देशभर आंदोलन करण्याच्या बिगरभाजप पक्षनेत्यांच्या निर्णयाला वाटाण्याच्या अक्षता लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हे पूर्वनियोजित आंदोलन २० ते ३० सप्टेंबर या काळात होणार असले तरी, पहिल्या दोन दिवसांमध्ये तरी काँग्रेससह कोणत्याही विरोधी पक्षाने लक्षवेधी निदर्शने, धरणे आयोजित केली नाहीत. काँग्रेसचे संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी पक्षनेत्यांना पत्र पाठवून आंदोलनाची आठवण मात्र करून दिली आहे. गेल्या महिन्यात २० ऑगस्ट रोजी १९ विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. त्यानुसार, देशाचे सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि लोकशाहीवादी हक्कांच्या रक्षणासाठी समविचारी पक्षांनी एकत्रितपणे देशभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसने मित्रपक्षांसह राज्या-राज्यांमध्ये ठरल्याप्रमाणे निदर्शने, धरणे आयोजित करावीत, असे वेणुगोपाल यांनी प्रदेशाध्यक्ष, खासदार, गटनेते, महासचिव, प्रभारी, विभागीय प्रमुख आदींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. ही निदर्शने करताना ज्येष्ठ नेते, खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख यांना सहभागी करून घ्यावे, असेही नमूद केले आहे. पंजाबचे नवनियुक्त मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांच्या सोमवारी झालेल्या शपथविधीनंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सिमला येथे दोन दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत. काँग्रेसची सत्ता असलेल्या पंजाबमध्ये पक्ष नवे सरकार बनवण्यात गुंतले असून राजस्थान व छत्तीसगढमध्ये पक्ष अंतर्गत वादात सापडला आहे. उत्तराखंड व उत्तर प्रदेश या विधानसभा निवडणूक होणाऱ्या राज्यांमध्येही काँग्रेसने अजून तरी आंदोलन हाती घेतलेले नाही. हरियाणा, गुजरात, हिमाचल, आसाम, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांतही भाजपविरोधी आंदोलनाला सुरुवात झालेली नाही.