मी राजकारणावर बोलण्याचा प्रयत्न करतो. पण मी अजून शिकत आहे. माझी वेळदेखील येईल, पण ती शिकल्यानंतर येईन असं सूचक विधान काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनी केलं आहे. रॉबर्ट वढेरा यांनी शुक्रवारी मुंबईतील प्रसिद्ध मुंबादेवीचं दर्शन घेतलं. यावेळी काहीजणांनी त्यांच्यासमोर मोदी-मोदी अशी घोषणाबाजी केली. यानंतर एबीपीला दिलेल्या मुलाखतीत रॉबर्ट वढेरा यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
‘माझ्या पत्नीच्या कुटुंबाने देशासाठी आयुष्य दिलं आहे. प्रियंका, राहुल यांच्या रक्तातच देशसेवा आहे. बदल व्हावा असं त्यांनाही वाटत आहे’, असं रॉबर्ट वढेरा यांनी सांगितलं. नरेंद्र मोदींकडून राजीव गांधींवर आरोप केले जात असल्यासंबंधी विचारलं असता, राजकारणात मर्यादा पाळली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. जी व्यक्ती शहीद झाली आहे, त्याच्यासाठी बोललं पाहिजे असं मला वाटलं म्हणून मी फेसबुकवर मत व्यक्त केलं असंही त्यांनी सांगितलं.
आपल्यावर होत असलेल्या आरोपांसंबंधी बोलताना, न्यायालायनेही व्यवस्थित चौकशी केल्यानंतर योग्य निर्णय दिला आहे. पण आपण न्यायालयापेक्षा मोठे नाही, मग आपण कोणत्याही जागी असोत. कायद्याचा आदर केला पाहिजे. मी कायद्यावर विश्वास ठेवतो. न्याय मागण्यासाठी मी न्यायालयात जाणार कारण तिथे न्याय मिळेल यावर माझा विश्वास आहे. माझ्यावर इतके आरोप करण्यात आले पण एकही गोष्ट सिद्ध झालेली नाही, नुसते आरोप करण्यात आले असं सांगितलं.
‘मी सगळ्यांचा आदर करतो. मी कोणत्याही पदावर नाही. मी नात्यांचा चुकीचा वापर केलेला नाही. पण माझ्या नात्यांवर भाष्य करत त्यांचा वापर केला जात आहे. पण मी नेहमी लढत राहणार. तुम्ही पाच वर्षात मला इतका त्रास दिलात पण आजही मी येथे आहे. माझ्या मुलांनाही त्रास झाला. कितीही त्रास दिलात तरी मी ठाम राहणार आहे’, असं रॉबर्ट वढेरा यांनी म्हटलं.
बहुमत मिळाल्यानंतर इतकी मोठी संधी असतानाही त्यांनी फायदा उचलला नाही असं सांगत रॉबर्ट वढेरा यांनी भाजपावर टीका केली. पंतप्रधान कोण झालं पाहिजे असं विचारलं असता हे जनाता ठरवेल असं ते म्हणाले. कोणतंही सरकार आलं तरी त्यांनी महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं.