येत्या २४ सप्टेंबरपासून काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. १७ ऑक्टोबरला मतदान, तर १९ ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाईल. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध केरळमधील थिरूअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांच्यात लढत होण्याची चर्चा आहे. मात्र, अध्यक्ष झालं तरी अशोक गेहलोत मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या तयारीत नसल्याच्या चर्चा आहेत. त्यावर आता काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अशोक गेलहोत यांनी मंगळवारी राजस्थानमधील आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी म्हटलं की, “राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक नाही लढती, तर मी अर्ज दाखल करणार आहे. त्यापूर्वी राहुल गांधी यांना एकदा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभारण्याची विनंती करणार आहे.” पण, पक्षाध्यक्ष पदासोबत मुख्यमंत्रीपदही आपल्याकडे ठेवण्याचा गेहलोत यांचा विचार आहे. यावरून ‘एक व्यक्ती दोन पद,’ असे चालणार नाही, अशा शब्दांत सचिन पायलट यांनी अशोक गेहलोत यांच्यावर निशाणा साधला आहे.
अशोक गेहलोत काँग्रेसचे अध्यक्ष बनले तर सचिन पायलट राजस्थानचे मुख्यमंत्री होऊ शकतात. परंतु, सचिन पायलट यांच्या नावाला आमदार पाठिंबा देतात हे पाहावे लागणार आहे. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्यास आमदारांचे समर्थन मिळण्याची शक्यता कमी आहे. यासाठी काँग्रेस हायकमांडला लक्ष ठेवावे लागणार आहे.
शशी थरुर-सोनिया गांधी यांची भेट
शशी थरूर यांनी सोमवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर अध्यक्षपदाच्या चर्चेला तोंड फुटले. अध्यक्षपदासाठी गांधी कुटुंबाचा पाठिंबा महत्त्वाचा असतो. मात्र, सोनियांनी थरूर यांना ही निवडणूक पूर्णपणे पारदर्शी पद्धतीने होईल, अशी ग्वाही दिली. तसेच, आपला कोणालाही पाठिंबा नसेल असे सूतोवाच केल्याचे माध्यमांनी नमूद केले आहे. ते पाहता ही निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रासह किमान सात ते आठ प्रदेश काँग्रेस समित्यांनी राहुल गांधी यांनी अध्यक्ष व्हावे म्हणून ठराव संमत केले आहेत. मात्र, राहुल गांधी यासाठी तयार नसल्याच्या चर्चा आहे.