अयोध्येत निर्माणाधीन असलेल्या राम मंदिराचे उदघाटन २२ जानेवारी २०२४ रोजी होणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. लोकसभा निवडणुकीआधी मंदिर खुले होणार असल्यामुळे याकडे संबंध देशाचे लक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीसह इतर ८००० व्यक्तींना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. श्री राम जन्मभूमी ट्रस्टकडून माजी क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनाही निमंत्रित केले असल्याची माहिती समोर येत आहे. या दोघांसह देशभरातून संत, अध्यात्मिक गुरू, सेलिब्रिटी, सनदी अधिकारी, संरक्षण विभागातील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

हे वाचा >> ‘संपूर्ण देश अयोध्यामय करणार’, रा. स्व. संघाकडून राम मंदिर उद्घाटनाचे नियोजन

विराट कोहलीच्या उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह

२५ जानेवरीपासून भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. त्यामुळे विराट कोहली उदघाटन सोहळ्याला उपस्थित राहणार का? याबाबत निश्चित माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच यावर्षी सप्टेंबर महिन्यात वाराणसी येथे क्रिकेट स्टेडियमच्या भूमीपूजनासाठीही सचिन तेंडुलकर उपस्थिती होते. त्यांच्यासह रवी शास्त्री आणि सुनील गावस्कर यांचीही भूमीपूजन कार्यक्रमाला उपस्थिती होती. मात्र या दोघांना मंदिराच्या उदघाटनासाठी निमंत्रित केले आहे का? याबाबतची ठोस माहिती मिळू शकलेली नाही.

या कोहली आणि तेंडुलकर यांच्याशिवाय उद्योगपती मुकेश अंबानी, गौतम अदाणी आणि रतन टाटा उपस्थित राहणार आहेत. बॉलिवूडमधून अमिताभ बच्चन, अभिनेते अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांनाही निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती जनसत्ता संकेतस्थळाने दिली आहे. ९० च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या रामायण या मालिकेत अरुण गोविल यांनी रामाची आणि दीपीका यांनी सीतेची भूमिका साकारली होती.

आणखी वाचा >> आमंत्रण की, निमंत्रण? अर्थामध्ये नेमका फरक काय?

राम मंदिर आंदोलनादरम्यान ज्या कारसेवकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांनाही श्री राम जन्मभूमी ट्रस्टने यावेळी निमंत्रित केले आहे. योग गुरू रामदेव, ४००० संत-साधू, लेखक, पत्रकार आणि वैज्ञानिकांनाही उदघाटनासाठी निमंत्रित केल्याचे सांगण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्री राम जन्मभूमी ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले की, ५० देशांमधून एका प्रतिनिधिला निमंत्रित करण्याचा आमचा विचार आहे. राम मंदिरासाठी आंदोलन करताना ५० कारसेवकांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबियांना यावेळी सन्मानाने निमंत्रित केले आहे. तसेच वैज्ञानिक, लेखक आणि न्यायाधीशांनाही आम्ही बोलावले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांसमवेत पद्म पुरस्कार विजेत्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.