कर्नाटकात काँग्रेसचे सरकार येताच स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी असलेला धडा अभ्यासक्रमातून वगळण्यात आला होता. यावरू देशभर वाद झाला. भाजपाने काँग्रेसवर टीकास्त्र डागलं. आता मध्य प्रदेश सरकारने शालेय अभ्यासक्रम अद्यायवत करण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार, त्यांनी नव्या अभ्यासक्रमात सावरकरांचा धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यमंत्री इंदर सिंग परमार यांनी याबाबत माहिती दिली.

“हिंदुत्त्वाचे विचारवंत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आता नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत अभ्यासाचा भाग असतील”, असं इंदर सिंग परमार यांनी सांगितलं. परंतु, विरोधी पक्ष काँग्रेसने याला राजकीय खेळी म्हणून संबोधले आहे.

देशात या शैक्षणिक वर्षांपासून नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने अनेक राज्यांमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. देशाचा इतिहास आणि देशाच्या स्वातंत्र्य, विकास आणि प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या नेत्यांविषयी माहिती देण्याचा प्रयत्न या नव्या शैक्षणिक धोरणातून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भगवान परशुराम, भगतिंह, राजगुरू, सुभाषचंद्र बोस आणि वीर सावरकर यांचे जीवन आणि गीता आदींविषयीचे धडे मध्य प्रदेशातील शाळांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहेत.

“आम्ही एक समिती तयार केली आहे. कोणत्या व्यक्तिमत्त्वांचा अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाईल, हे ही समिती ठरवेल. तसंच, कोणत्या इयत्तेत हे धडे समाविष्ट करायचे हेही ठरवलं जाईल. नव्या शैक्षणिक धोरणानुसार भारतीय समाजातील माहिती, भारतातील थोर व्यक्तीमत्त्व यांची माहिती अभ्यासक्रमातून दिली जात आहे”, अशी माहिती इंदर सिंग परमार यांनी दिली.

“भारतीय क्रांतीकारकांना काँग्रेसने शालेय अभ्यासक्रमात योग्य जागा दिली नाही. सावरकरांशिवाय वल्लभभाई पटेल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, राजगुरू, भगतसिंह, लोकमान्य टिळक आदींविषयीचे धडे अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहेत”, असंही परमार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तर प्रदेशातही सावरकरांवर धडा

उत्तर प्रदेशात ५० थोर व्यक्तिमत्त्वांचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि जनसंघ नेते दिनदयाळ उपाध्याय यांचाही समावेश आहे. सावरकरांचा धडा इयत्ता नववीत शिकवण्यात येणार असून दिनदयाळ यांच्याविषयी इयत्ता अकरावीत धडा असणार आहे.