Wrestler Protest in Jantar Mantar : भारतीय कुस्तीपटू महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी गेल्या महिन्याभरापासून आंदोलन छेडलं आहे. जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने कुस्तीगीरांनी न्याय हक्कांसाठी त्यांचा मोर्चा नव्या संसद भवनात वळवला आहे. नव्या संसद भवनाचं आज उद्घाटन होत असताना कुस्तीगीरांनी तिथेच महापंचायत भरवण्याचा निश्चय केला होता. पंरतु, त्यांचा हा निश्चय पोलिसांनी हाणून पाडला असून नव्या संसद भवनाच्या दिशेने जाणाऱ्या काही कुस्तीगीरांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे जंतर मंतर ते नव्या संसद भवनाच्या मार्गावर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून येथील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे.

गेल्या महिन्याभरापासून कुस्तीगीरांनी जंतर मंतरवर आंदोलन पुकारले आहे. परंतु, ब्रिजभूषण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून घेण्याव्यतिरिक्त काहीही करण्यात आले नाही. त्यामुळे ब्रिजभूषण यांना अटक होत नाही तोवर आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार कुस्तीगीरांनी केला आहे. परंतु, त्यांच्या आंदोलनाकडे सरकारकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नव्या संसद भवनात आज कुस्तीगारांनी महिला महापंचायतीचं आयोजन केले होते. आपल्या न्याय-हक्कांसाठी जंतर मंतरहून नव्या संसद भवनात जाताना कुस्तीगीरांनी मोर्चा काढला. मात्र, मोर्चाला पोलिसांनी अडवले आहे. तसंच, नव्या संसद भवनात आयोजित केलेल्या महिला महापंचायतीसाठी कुस्तीगीरांनी परवानगी घेतली नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्यांचा मोर्चा अडवण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भवन परिसर आणि जंतर मंतर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून काही कुस्तीगीरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

नव्या संसद भवनावर आज महापंचायतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या महापंचायतीचं नेतृत्त्व महिलांकडून करण्यात येणार आहे. परंतु, पोलिसांनी आता कुस्तीगीरांची धरपकड केल्याने महापंचायत होणार की नाही याबाबत साशंकता आहे. परंतु, महापंचायत होणारच असा ठाम निर्धार कुस्तीपटू बजरंग पुनिया याने बोलून दाखवला. “आम्ही आमच्या स्वाभिमानासाठी लढतो आहोत. ते आज नव्या संसद भवनाचं उद्घाटन करत आहेत, परंतु, देशातील लोकशाहीची हत्या करत आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कुस्तीगीरांना सोडण्याचे आवाहन आम्ही प्रशासनाला करतो आहोत”, असं बजरंग पुनिया म्हणाला.

हेही वाचा >> “उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिलीच, आता काँग्रेसवासी…”, आशिष शेलारांचा घणाघात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुस्तीगीरांच्या या आंदोलनाला शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राकेश टिकैत यांचंही समर्थन आहे. त्यांनीही या महापंचायतीसाठी आज दिल्ली गाठली. परंतु, युपी गेटवरच त्यांना रोखण्यात आलं आहे. त्यांना दिल्लीच्या आत शिरण्यास मनाई करण्यात आली आहे.