‘२६/११: आरएसएस की साजिश?’ पुस्तक ज्या मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित झालं त्यापैकी एक असणाऱ्या कृपाशंकर सिंह यांनी आजच भाजपामध्ये प्रवेश केला आणि काँग्रेस नेते हे बिरुद बदलून आता भाजपा नेते असं बिरुद त्यांच्या नावामागे लागलं. याच कृपाशंकर सिंह यांनी २०१० साली काँग्रेसमध्ये असताना ‘२६/११: आरएसएस की साजिश?’ असं एक पुस्तक प्रकाशित केलं होतं आणि आता त्यांनी भाजपात प्रवेश केला. हीच गोष्ट भाजपा समर्थक शेफाली वैद्य यांनी ट्विटरवरुन लक्षात आणून देत काँग्रेसला खोचक टोला लगावला आहे.
आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणतात, “महेश भट, दिग्विजय सिंह आणि इतरांनाही भाजपाने बोलवावं आणि पक्ष कार्यालयात पुन्हा एकदा असाच फोटो काढावा”. या ट्विटमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, किरीट सोमय्या, जे पी नड्डा अशा भाजपाच्या नेत्यांना टॅग केलं आहे.
Nice! Now please invite Mahesh Bhatt and @digvijaya_28 and the rest of these worthies as well into @BJP4India so you can recreate this picture in the party office! @Dev_Fadnavis @ChDadaPatil @ShelarAshish @jitengajaria @KiritSomaiya @shweta_shalini @JPNadda @BJP4Maharashtra https://t.co/69trIq9LA3 pic.twitter.com/Zqwg2vExFk
— Shefali Vaidya. (@ShefVaidya) July 7, 2021
या पुस्तकाच्या प्रकाशनावरुन त्यावेळी गदारोळ माजला होता. काँग्रेसचे त्यावेळचे सरचिटणीस दिग्विजय सिंह हेही या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी उपस्थित होते. २६/११ च्या हल्ल्यावेळी दहशतवादी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांना काही प्रखर हिंदुत्ववाद्यांकडून धमक्या येत असल्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला होता. प्रखर हिंदुत्ववादी आरोपी असलेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या चौकशीला विरोध करणाऱ्यांच्या सततच्या धमक्यांना करकरे कंटाळले होते, असं त्यांनी मला स्फोटाआधी दोन तासांपूर्वी फोन करुन सांगितलं होतं, असा दावा सिंह यांनी त्यावेळी केला होता.
करकरे यांना धमक्या देणारी विचारसरणी तीच आहे जिच्यामुळे महात्मा गांधींचा खून झाला आणि हिंदू आणि मुस्लिमांच्यात दरी निर्माण झाली, असंही ते म्हणाले होते. त्याचबरोबर या सगळ्याला त्यांनी प्रखर हिंदुत्ववादी संघटनांना जबाबदार धरलं होतं. त्यात शिवसेना, गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री आणि सध्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांचाही समावेश होता.
यावेळच्या आपल्या भाषणामध्ये त्यांनी दहशतवादाची उगमस्थानं म्हणत भाजपाशासित राज्यांवर तसंच हिंदू गटांवर निशाणा साधला होता. तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही दहशतवादाचे गंभीर आरोप केले होते. यावेळी आजच भाजपात सामील झालेले आणि तत्कालीन काँग्रेस नेते कृपाशंकर सिंहही व्यासपीठावर उपस्थित होते. यामुळेच आता त्यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा होत आहे.