गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये हत्यासत्र सुरू आहे. श्रीनगरच्या मध्यवर्ती भागातील एका सरकारी शाळेत मुख्याध्यापिकेसह अन्य एका शिक्षकाची दहशतवाद्यांनी गुरुवारी गोळ्या झाडून हत्या केली. गेल्या पाच दिवसांत दहशतवाद्यांनी सात नागरिकांचा बळी घेतल्याने काश्मीरमधील दहशतीचे सावट गडद झाले आहे. याच मुद्द्यावरुन आता शिवसेनेनं केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या भाजपाच्या धोरणावर टीका केली आहे. ईडी, सीबीआय, आयटीसारख्या यंत्रणा वापरुन राजकीय विरोधकांना लक्ष्य केलं जातं असतानाच काश्मीरमध्ये मात्र केंद्राला यंत्रणा वापरुन दहशतवाद थांबवण्यात अपयश येत आहे असा टोला शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावला आहे. इतकचं नाही तर भाजपाचे कार्यकर्ते अगदी क्रूझवरील पार्ट्यांपासून ते शेतकरी आंदोलनाविरोधामध्ये ‘खासगी आर्मी’ उभारण्यापर्यंत सगळीकडेच दिसून येत आहेत तर त्यांनीच छातीचा कोट करून कश्मीरातही जावे असा खोचक सल्ला शिवसेनेनं दिलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुस्लिम अधिकाऱ्यांनाही अतिरेक्यांकडून लक्ष्य केले जात आहे
“भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, प्रवक्ते आणि भक्त सर्वत्रच आहेत. फक्त ते कश्मीर खोऱ्यात दिसत नाहीत. कश्मीर खोऱ्यात गेल्या चार दिवसांत भयंकर असा रक्तपात घडला आहे. सात नागरिकांना अतिरेक्यांनी दिवसाढवळय़ा ठार केले. दहशतवादी गावात घुसतात, ओळखपत्रे तपासून हिंदू किंवा शिखांना ठार करतात असे हत्यासत्रच सध्या कश्मीरमध्ये सुरू आहे. श्रीनगरला शाळेच्या महिला प्राचार्यांना अतिरेक्यांनी ठार केले. या प्राचार्या कश्मिरी शीख समाजाच्या होत्या. दीपक चांद नावाच्या शिक्षकास गोळय़ा घालून मारले. ते कश्मिरी पंडित होते. फक्त कश्मिरी पंडित, हिंदू, शीखच नाहीत, तर पोलीस खात्यात कर्तव्य बजावणाऱ्या मुस्लिम अधिकाऱ्यांनाही अतिरेक्यांकडून लक्ष्य केले जात आहे,” असं लेखाच्या सुरुवातीला म्हटलं आहे.

हिंदूंना वाचविण्यात तुम्ही अपयशी ठरला आहात
“कश्मीर पुन्हा हिंसाचाराच्या ज्वालामुखीवर उभे आहे. नोटाबंदी केल्यामुळे दहशतवाद थांबेल असे केंद्र सरकार सांगत होते. नोटाबंदीमुळे बनावट नोटांचे उत्पादन थांबेल व अतिरेक्यांची आर्थिक रसद तुटेल असे सांगितले गेले, ते खरे ठरले नाही. त्यानंतर ३७० कलम हटवले. ३७० कलम हटवल्याने खोऱ्यातील हिंसाचारालाच आळा बसेल व पाकड्यांचे धाबे दणाणेल, असा दावा केला जात होता. तोदेखील फोल ठरला. कश्मीर खोऱ्यातील लोक जीव मुठीत धरूनच जगत आहेत. कश्मिरी पंडितांच्या घरवापसीबाबत भाजपाने मोठा गाजावाजा केला. मात्र पंडितांची घरवापसी सोडाच, पण उरलेसुरले पंडितही पलायन करीत आहेत. हिंदुत्वाचा फुका अभिमान मिरवता, पण कश्मीरातील हिंदूंना वाचविण्यात तुम्ही अपयशी ठरला आहात,” असा टोला सत्ताधारी भाजपाला लगावण्यात आलाय.

नोटाबंदीचे सर्जिकल स्ट्राईक चालले नाही
“लखीमपूर खेरीतही चार हिंदू, शीख त्यांनी चिरडून मारले आणि कश्मीरातील हिंदूंना वाऱ्यावर सोडले आहे. कश्मीर खोऱ्यातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक आणि हाताबाहेर जाताना दिसत आहे. अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यापासून फुटीरतावाद्यांना जोर चढला आहे. अफगाणिस्तानातील तालिबानी सरकार हे पाकड्यांचे पाप आहे व त्यांच्या मदतीने कश्मीरवर चढाई करू, असे पाक पंतप्रधान इम्रान खान यांचे स्वप्न आहे. या स्वप्नाच्या चिंधडय़ा कशा उडविणार आहात ते सांगा. पोकळ भाषणे, आश्वासने व निवडणुकांच्या तोंडावरील ‘सर्जिकल स्ट्राईक’चे बहाणे करून कश्मीर वाचणार नाही व हिंदूंचे रक्षण होणार नाही. पुन्हा येथे नोटाबंदीचे सर्जिकल स्ट्राईक चालले नाही हेसुद्धा लक्षात घेतले पाहिजे,” असं लेखात म्हटलं आहे.

काश्मीर हा देशातील मतपेटीचा विषय
“कश्मीरच्या अतिरेक्यांना अमली पदार्थांच्या व्यवहारातून अर्थपुरवठा होतो. नोटाबंदीमुळे अमली पदार्थांच्या व्यवहाराला आळा बसेल असे तेव्हा सांगितले. गेल्या दोन वर्षांत भारतातील अमली पदार्थांचा व्यवहार शंभर पटीने वाढला. महिनाभरापूर्वीच गुजरातमध्ये तीन हजार किलो ‘ड्रग्ज’ पकडले. त्याची किंमत साधारण २५ हजार कोटी इतकी आहे. कश्मीर खोऱ्यात रोज अमली पदार्थांचे साठे सापडत आहेत. जे सापडते ते दिसते. जे चलनात, व्यवहारात आले ते अदृश्यच आहे. एकंदरीत कश्मीरबाबतच्या धोरणांचा साफ फियास्को झाला आहे. कश्मीर प्रश्नाचे नको तितके राजकारण झाले. काश्मीर हा देशातील मतपेटीचा विषय बनला,” अशा शब्दांमध्ये काश्मीरसंदर्भातील धोरणांवर टीका करण्यात आलीय.

अतिरेक्यांना भय उरले नाही
‘‘पाकव्याप्त कश्मीरही भारताला जोडू, असे सांगून मते मिळवली गेली, पण आपल्या कश्मीरात हिंदुस्थानवाद्यांना जगणे कठीण झाले आहे. पंतप्रधान व गृहमंत्र्यांनी कश्मीरप्रश्नी आरपारची लढाई करावी, असे देशातील जनतेला वाटणे स्वाभाविक आहे. कारण कश्मीर खोरे रोज निरपराध्यांच्या रक्ताने भिजत आहे. त्यांच्या किंकाळय़ा व आक्रोशाने थरारत आहे. शिवाय अतिरेक्यांना भय उरले नाही हे तर आहेच, पण कायद्याचे राज्यदेखील खोऱ्यात अस्तित्वात नाही. इतर राज्यांत ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांचा वापर करून राजकीय विरोधकांच्या नाड्या आवळता येतात, पण कश्मीर खोऱ्यातील अतिरेक्यांच्या बाबतीत तेही करता येत नाही,” असं लेखात म्हटलंय.

कार्यकर्त्यांनी छातीचा कोट करून कश्मीरातही जावे
“मुंबईतील ‘एनसीबी’च्या धाडसत्रात भाजपाचे कार्यकर्ते सामील झाल्याचे समोर आले. ईडी, सीबीआय, आयटीसारख्या यंत्रणाही भाजपाबरहुकूम चालत आहेत. या तपास यंत्रणांचा ताबा जणू भाजपाने घेतला आहे. सध्या भाजपा सर्वत्रच दिसतोय. फक्त कश्मीर खोऱ्यात निरपराध्यांच्या हत्या सुरू असताना केंद्र सरकार, भाजपाचे अस्तित्व दिसत नाही. भाजपा कार्यकर्त्यांचे अस्तित्व क्रूझवरील ‘रेव्ह’ पार्ट्यांत जसे ईडी, आयटीत दिसते तसे ते कश्मीर खोऱ्यातही दिसावे. भाजपाचे लोक नशेखोरांना अमली पदार्थांच्या साठय़ासह पकडून देतात, ईडीला कारवाया पुढे रेटण्यात मदत करतात. एवढेच नव्हे, तर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘शांत’ करण्यासाठी ‘खासगी आर्मी’ उभारावी असे जाहीर सल्लेही त्या पक्षाचे नेते आपल्या कार्यकर्त्यांना देतात. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीच मध्यंतरी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘जशास तसा’ धडा शिकविण्यासाठी भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्हय़ात ‘दंडा फोर्स’ म्हणजे खासगी आर्मी उभारावी, असे म्हटले होते. तुमचा हा ‘दंडा फोर्स’ देशातल्या गरीब आणि न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात वापरण्यापेक्षा कश्मीरातील दहशतवाद्यांविरोधात वापरा. कश्मीर खोऱ्यात सध्या दहशतवाद्यांकडून निरपराध पंडित आणि शिखांच्या हत्या केल्या जात आहेत. तेव्हा या धडपड्या कार्यकर्त्यांनी छातीचा कोट करून कश्मीरातही जावे. त्यांची वाहव्वाच होईल,” असा टोला लेखाच्या शेवटी लगावण्यात आलाय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena slams bjp over murders in kashmir issue says sent party supporters to fight terrorists scsg
First published on: 09-10-2021 at 07:44 IST