Sonam Raghuvanshi राजा रघुवंशीही हत्या आणि त्या प्रकरणात त्याची बेपत्ता झालेली पत्नी सापडणं आणि तिच्याविषयी पोलिसांनी केलेला दावा या सगळ्यामुळे राजा आणि सोनम रघुवंशी ही नावं देशभरात चर्चेत आहेत. दरम्यान राजाची पत्नी सोनम रात्री १ च्या सुमारास एका उत्तर प्रदेशातील ढाब्यावर गेली होती. तिथल्या मालकाला तिने राजा कसा मारला गेला ते सांगितलं ही बातमी आता समोर आली आहे.
इंदूरमधील राजा आणि सोनम प्रकरणाची चर्चा
इंदूरमधील नवविवाहित दाम्पत्य सोनम व राजा सूर्यवंशी सध्या माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले आहे. राजा सूर्यवंशीची मेघालयमध्ये हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून २ जून रोजी त्याचा मृतदेह सापडला. मात्र बेपत्ता असणारी सोनम आता सापडली आहे. मेघालयमधून बेपत्ता झालेली सोनम उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये सापडल्यामुळे या प्रकरणातलं गूढ वाढलंय. मेघालय पोलिसांनी राजाची हत्या सोनमनंच केल्याचा दावा केला आहे. मात्र, तिच्या वडिलांनी उलट पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत. त्यातच आता सोनमनं गाझीपूरमधून सर्वात आधी तिच्या भावाला फोन केल्याचं स्पष्ट झालं आहे.इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, सोनम रघुवंशीनं बेपत्ता झाल्यानंतर पहिल्यांदाच तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यात तिनं तिचा चुलत भाऊ गोविंद याला फोन केला होता. तर ढाबा मालकाने सोनमने त्याला राजा कसा मारला गेला ते सांगितल्याचं म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे गाझीपूर येथील ढाबा मालकाने?
गाझीपूर येथील काशी ढाबा साहिल यादव चालवतो. त्याने सांगितलं सोनम ढाब्यावर साधारण रात्री एकच्या सुमारास आली. मला फोन करायला तुझा मोबाइल दे अशी विनंती तिने मला केली. मी जेव्हा तिला विचारलं की काय झालंय तेव्हा ती म्हणाली तिचा फोन चोरीला गेला आहे आणि तिला कुटुंबाशी संपर्क करायचा आहे. त्यावेळी सोनम रडत होती आणि अडखळत बोलत होती. तिने मला पाणी मागितलं मी तिला पाणी दिलं. मी तिला सांगितलं तू घाबरु नकोस इथे जवळच पोलीस स्टेशनही आहे. ती थोडावेळ बसली आणि शांत झाली. त्यानंतर मी तिला विचारलं की काय झालं? त्यावर तिने मला सांगितलं की की मे महिन्यात माझं लग्न झालं. माझा नवरा आणि मी हनिमूनला गेलो होतो. तिथे आम्हाला लुटण्याचा प्रयत्न एका टोळीने केला. त्यावेळी राजा मला वाचवू लागला. मला वाचवताना तो मारला गेला. आम्हाला जी टोळी लुटायला आली होती त्यांना माझ्या अंगावरचे दागिने हवे होते. त्यानंतर तिला साहिलने विचारलं की तू शिलाँगहून उत्तर प्रदेशात कशी काय आलीस? त्यावर तिने आठवत नाही हे उत्तर दिलं. मी तोपर्यंत तिच्या कुटुंबाशी बोललो होतोच. तसंच पोलिसांनाही बोलावलं होतं. साधारण अडीच वाजण्याच्या सुमारास पोलीस आले आणि तिला अटक केली अशी माहिती साहिलने दिली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी सोनमबाबत काय सांगितलं?
उत्तर प्रदेशचे ADG अमिताभ यश यांनी सांगितलं की सोनम रघुवंशी त्यांन काशी ढाबा उत्तर प्रदेश या ठिकाणी सापडली. दरम्यान मेघालय पोलिसांनी हा दावा केला आहे की सोनम रघुवंशीनेच तिचा पती राजाची हत्या घडवून आणली. राज कुशवाह, विशाल सिंग आणि आकाश राजपूत यांना तिनेच बोलवलं होतं. या प्रकरणाचा पुढील तपास आता सुरु आहे.
नेमकं प्रकरण काय?
११ मे रोजी सोनम व राजा रघुवंशीचा विवाह झाला. २० मे रोजी दोघेही मेघालयला फिरण्यासाठी गेले आणि २३ मे पासून दोघेही बेपत्ता झाले. २ जून रोजी मृतदेह सापडल्यानंतर राजा रघुवंशीची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं. त्याच्या मृतदेहाशेजारी स्थानिकांकडून वेगवेगळ्या कामांसाठी वापरली जाणारी धारदार दाव सापडली. यानेच राजाची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानंतर आता सोनमदेखील सापडली असून तिनंच पतीची हत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनीदेखील एक्सवरील पोस्टमध्ये तीच माहिती दिली आहे.