३१ डिसेंबरच्या संध्याकाळी जम्मू-काश्मीरमधील वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी होऊन १३ जणांना आपले प्राण गमवावे लागले. अनेक जण जखणी देखील झाले. या दुर्दैवी घटनेमुळे देशभरात हळहळ व्यक्त झाल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये देखील आज तशीच मोठी दुर्घटना टळल्याचा प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधील महिला काँग्रेस नेत्या आणि बरेलीच्या माजी महापौरी सुप्रिया अॅरॉन यांनी आयोजित केलेल्या महिला मॅरेथॉनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यासंदर्भात आता भाजपाकडून टीका केली जात आहे. नेमकं घडलं काय? यासंदर्भातला व्हिडीओ भाजपा महिला कार्यकर्त्या प्रीती गांधी यांनी ट्वीट केला आहे. सुप्रिया अॅरॉन यांनी आयोजित केलेल्या महिला मॅरेथॉन स्पर्धेचा हा व्हिडीओ आहे. यामध्ये शेकडो महिला आणि मुली सहभागी झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. मॅरेथॉन सुरू करण्याचा इशारा होताच या महिला आणि मुलींनी धावायला सुरुवात केली. पण काही क्षणाच पुढच्या काही मुली खाली पडल्या. त्यांच्या मागून शेकडो मुली आणि महिला धावत येत होत्या. मागून घाई आणि धक्का दिल्यामुळे या मुली पडल्या. दरम्यान, वेळीच आयोजकांपैकी काही सदस्य मध्ये आले आणि त्यांनी खाली पडलेल्या मुलींना पुन्हा उचलून उभं केलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मागून येणाऱ्या शेकडो स्पर्धकांमुळे पुन्हा एकदा देशात चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडू शकली असती. या घटनेमध्ये काही मुली जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुप्रिया अॅरॉन यांचा धक्कादायक दावा! दरम्यान, यासंदर्भात सुप्रिया अॅरॉन यांनी धक्कादायक दावा केला आहे. इंडिया टुडेनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे. "जर वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी होऊ शकते, तर या घटनेचा आपण गाजावाजा करु नये. हा मानवी स्वभाव आहे", असं त्या म्हणाल्याचं या वृत्तात नमूद केलं आहे. तसेच, यासंदर्भात नंतर माफी मागतानाच हा काँग्रेसविरोधात कट असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केल्याचं देखील या वृत्तात म्हटलं आहे.