Tej Pratap Yadav Post: राष्ट्रीय जनता दल पक्षात सध्या वादळ निर्माण झालेले आहे. तेज प्रताप यादव यांना त्यांच्याच वडिलांनी पक्ष आणि कुटुंबातून हद्दपार केले. त्यानंतर आठवडाभर शांत राहिलेले तेज प्रताप यादव आता पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. आज सकाळी त्यांनी वडील लालू प्रसाद यादव आणि आई राबडी देवी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी पोस्ट केली होती. त्यानंतर आता त्यांनी आणखी एक पोस्ट करत महाभारतातील कृष्णाचा उल्लेख केला आहे. त्यांचा इशारा पक्षाअंतर्गत काही लोकांना असल्याचे बोलले जाते.
तेज प्रताप यादव यांनी या पोस्टमध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही. पण त्यांच्या लिखाणावरून ते लहान भाऊ तेजस्वी यादव याला अर्जुन म्हणत आहेत. तर स्वतःला त्यांनी कृष्णाची उपमा दिली आहे. ते म्हणाले, “काही लोक मला माझ्या अर्जुनापासून वेगळे करण्याचे स्वप्न पाहत आहेत. पण तुम्ही तुमच्या कटात कधीही यशस्वी होणार नाही. तुम्ही कृष्णाची सेना घेऊ शकता, पण खुद्द कृष्णाला नाही.”
याच पोस्टखाली तेज प्रताप सध्या कुटुंबात चाललेल्या कलहाचा उल्लेख करत तेजस्वी यादव यांच्याशी निष्ठा असल्याचे सांगतात. “मी लवकरच प्रत्येक कटाचा भांडाफोड करणार आहे. माझ्या भावा तू माझ्यावर विश्वास ठेव. परिस्थिती कशीही असली तरी मी तुझ्याबरोबर आहे. सध्या मी खूप दूर आहे. पण माझा आशीर्वाद आणि इच्छाशक्ती सदैव तुझ्यामागे आहे. माझ्या भावा, आई-वडिलांची काळजी घे. जयचंद हे सर्व ठिकाणी आहेत. ते घरात आणि बाहेरही आहेत”, असा इशारा तेज प्रताप यादव यांनी दिला.
तेज प्रताप यांनी आपल्या आई-वडिलांसाठी लिहिलेल्या भावनिक पोस्टनंतर काही वेळाने ही नवीन पोस्ट टाकली आहे. “आई-बाबा, तुम्ही माझे विश्व आहात. तुमचा आदेश मला देवापेक्षाही मोठा आहे. मला फक्त तुमचा विश्वास आणि प्रेम हवे आहे, त्यापेक्षा अधिक काही नको”, असे तेज प्रताप यादव या पोस्टमध्ये म्हणाले होते.
या वर्षअखेरीस बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. तसेच जुलै महिन्यात राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड होणे अपेक्षित आहे. या दोन मोठ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप सारख्या नेत्याला पक्षातून बाहेर काढणे, तसेच ज्या कारणासाठी पक्षातून काढले गेले, त्या कारणावरून होणारी चर्चा, यामुळे आरजेडी समोरच्या अडचणी वाढलेल्या आहेत.
२५ मे रोजी तेज प्रताप यांच्या फेसबुकवर त्यांनी कथित प्रेयसी अनुष्का यादव यांचा फोटो पोस्ट केला होता. तसेच १२ वर्षांपासून आपले प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली होती. या फोटोनंतर बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली. कारण २०१८ साली तेज प्रताप यादव यांचे लग्न झालेले होते. त्यानंतर काही महिन्यातच त्यांच्यात वाद निर्माण झाले. सदर प्रकरण समोर आल्यानंतर पूर्व पत्नी ऐश्वर्या राय यांनीही यादव कुटुंबावर टीका केली.
तेजस्वी यादव यांनी अद्याप या विषयापासून अंतर राखलेले आहे. त्यांनी मोठ्या भावाचा वैयक्तिक विषय असल्याचे म्हटले. तसेच आम्ही अशा गोष्टीचे समर्थन करत नाही, राजकीय आणि वैयक्तिक जीवन वेगवेगळे असायला हव, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.