इंडिया आघाडीने आज (३१ मार्च) एकत्र येत दिल्लीत ‘लोकतंत्र बचाव महारॅली’ काढली. या रॅलीच्या माध्यमातून विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपावर जोरदार टीका केली. या रॅलीत देशभरातील २८ पक्ष सहभागी झाले होते. यावेळी बोलताना बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एक गाणे गात खोचक टोला लगावला. तेजस्वी यादव यांनी म्हटलेल्या गाण्याला सभेतील उपस्थितांनीही चांगलीच दाद दिली. ‘भारतीय जनता पक्ष खोटा पक्ष असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली गॅंरटी ही चायनीच गॅंरटी आहे. ही गॅंरटी फक्त निवडणुकी पुरतीच आहे’, असा निशाणाही तेजस्वी यादव यांनी सभेत बोलताना साधला.

तेजस्वी यादव नेमके काय म्हणाले?

“इंडिया आघाडी म्हणून आम्ही सर्वजण देशाचे संविधान वाचविण्यासाठी एकत्र आलो आहोत. देशात आज द्वेषाचे राजकारण केले जात आहे. या द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांच्या विरोधात लढण्यासाठी आम्हाला जनतेचा आशीर्वाद मिळावा, अशी आमची इच्छा आहे. भाजपावाले ४०० पारचा नारा देत आहेत. मात्र, भाजपावाले काही म्हणाले तरी जनता हीच देशाची मालक असते. त्यामुळे जनता जे ठरवेल, तेच दिल्लीत सरकारमध्ये बसतील. भाजपावाल्यांनी निवडणुकीच्या आधीच ४०० पारचा नारा दिल्यामुळे आधीच मॅच फिक्सिंग झाल्यासारखे वाटते आहे. काही झाले तरी या भाजपावाल्यांना सत्तेतून बाहेर खेचा”, अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली.

हेही वाचा : “पंतप्रधान मोदींकडून मॅच फिक्सिंगचा प्रयत्न; निवडणुकीआधी आमच्या दोन खेळाडूंना…”; राहुल गांधींचा गंभीर आरोप

“केंद्रात जे लोक सत्तेत बसली आहेत, ती लोक खूप घंमडी आहेत. सत्तेत जे बसले, त्यांना प्रश्न विचारण्याचे आमचे कर्तव्य आहे. देशात सर्वात मोठा दुश्मन म्हणजे बेरोजगारी, महागाई आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणालाही कोणतीही नोकरी दिली नाही. सर्वच्या सर्व खासगी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भारतीय जनता पार्टीत ईडी, सीबीआय, आयकर विभाग यांचा समावेश आहे. त्यांनी आम्हालादेखील खूप त्रास दिला. पण आम्ही घाबरणारे लोक नाहीत. केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांना अटक करण्याचे काम भाजपाच्या लोकांनी केले. त्यांना सांगू इच्छिचो की, आम्ही संघर्ष करणारे लोक असून पिंजऱ्यात फक्त वाघालाच बंद केले जाते. त्यामुळे आमच्याकडे सगळे वाघ आहेत. तुम्ही किती लोकांना जेलमध्ये टाकणार आहात?”, असा सवाल त्यांनी भाजपाला केला.

“भारतीय जनता पक्षाचे लोक खोटे बोलणारे आहेत. यूरिया देऊन साखर दिली म्हणून सांगणारे हे लोक आहेत. भाजपावाले डोळे फोडून चष्मा देतील आणि सांगतील की आम्ही चष्मा दिला. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास करू नका. मोदींची गॅंरटी ही चायनीच गॅंरटी आहे. फक्त निवडणुका आहेत तो पर्यंतच मोदींची गॅरंटी आहे, नंतर काही नाही”, असेही तेजस्वी यादव म्हणाले. भाषणाच्या शेवटी तेजस्वी यादव यांनी एक गाणे गात मोदींवर निशाणा साधला.

तेजस्वी यादव यांनी सभेत कोणते गाणे गायले?

“तुम तो धोकेबाज हो…वादा करके भूल जाते हो…
रोज-रोज मोदीजी तुम ऐसा करोगे.. जनता जो रुठ गई तो हाथ मलोगे…
आरे तुम तो धोकेबाज हो…वादा करके भाग जाते हो…”