Tirupati Ladoos : आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर झाल्याचा गंभीर आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला. त्यांच्या या आरोपानंतर मोठी खळबळ उडाली. यावरून आता आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी सनातन धर्म संरक्षण मंडळ स्थापन करण्याचे आवाहन केल आहे.

“गेल्या सरकारच्या कार्यकाळात तिरुपती बालाजी प्रसादमध्ये प्राण्यांची चरबी (माशाचे तेल, डुकराचे मांस आणि गोमांस चरबी) मिसळल्याच्या निष्कर्षांमुळे आम्ही सर्वजण खूप व्यथित झालो आहोत. अनेक प्रश्नांची उत्तरे वायसीपी या तत्कालीन सरकारने स्थापन केलेल्या टीटीडी बोर्डाने द्यायला हवीत”, असं पवन कल्याण म्हणाले. ते पुढे म्हणाले की आंध्र सरकार कठोर कारवाई करण्यास वचनबद्ध आहे.

हेही वाचा >> Tirupati Balaji Prasad : तिरुपती मंदिरातील प्रसादामध्ये जनावरांच्या चरबीचा वापर झाला होता का? रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर!

“… संपूर्ण भारतातील मंदिरांशी संबंधित सर्व समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘सनातन धर्म संरक्षण मंडळ’ स्थापन करण्याची वेळ आली आहे”, असं पवन कल्याण म्हणाले. ते म्हणाले की धोरणकर्ते, धार्मिक प्रमुख, न्यायव्यवस्था, नागरिक आणि प्रसारमाध्यमे यांच्यात चर्चा होण्याची गरज आहे.

“माझा विश्वास आहे की, ‘सनातन धर्माचा’ कोणत्याही स्वरूपात होणारा अपमान थांबवण्यासाठी आपण सर्वांनी त्वरित एकत्र आले पाहिजे”, असंही ते म्हणाले.

लॅबच्या रिपोर्टमध्ये काय आढळलं?

तिरुपती मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी आणि फिश ऑईलचे अंश आढळून आल्याचे सिद्ध झाले असल्याची माहिती लॅबच्या तपासणी रिपोर्टमधून समोर आली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मागील वायएसआर काँग्रेस सरकारवर तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी वापरल्याचा आरोप केला होता. आता तेलुगु देसम पक्षाने यासंदर्भातील प्रयोगशाळेचा एक रिपोर्ट समोर आणला आहे. या रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रयोगशाळेच्या रिपोर्टमध्ये असं उघड झालं आहे की, तिरुपती मंदिरात लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या नमुन्यांमध्ये प्राण्यांची चरबी, फिश ऑइल आणि बीफ टॅलोचा समावेश होता. या प्रयोगशाळेचा रिपोर्ट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे. तसेच हा रिपोर्ट भारतीय जतना पक्षाचे नेते विनोद तावडे यांनी देखील एक्सवर शेअर केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंद्राबाबू नायडूंच्या आरोपानंतर मोठा वाद

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या काळात तिरुपती देवस्थानाच्या (Tirupati Balaji ) वतीनं भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या प्रसादाच्या लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात होता, असा आरोप केला. चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या या आरोपामुळे आंध्र प्रदेशात मोठा वाद निर्माण झाला आहे.