करोनाचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी आणि ओमायक्रॉनला वेळीच आवर घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने काही निर्बंध आज जाहीर केले आहेत. या पार्श्वभूमीवर देश पातळीवर देखील निर्बंध घातले जाण्याची मागणी केली जात आहे. महाराष्ट्राप्रमाणेच देशात देखील गेल्या काही दिवसांमध्ये करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढी लागली आहे. शुक्रवारी सकाळी केंद्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशभरात गेल्या २४ तासांत एकूण १६ हजार ७६४ नव्या करोना बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. चिंतेची बाब म्हणजे देशातला ओमायक्रॉन बाधितांचा आकडा आता १२७० झाला आहे!

ओमायक्रॉनचा वाढता प्रसार, महाराष्ट्रात सर्वाधिक

देशभरात २३ राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण सध्या असल्याची माहिती केंद्र सरकारने जाहीर केली आहे. सध्या असलेल्या अॅक्टिव्ह ओमायक्रॉन बाधितांचा आकडा १२७० असून त्यात सर्वाधिक ४५० ओमायक्रॉन बाधित हे महाराष्ट्रात आहेत. त्याखालोखाल ३२० दिल्लीत, १०९ केरळमध्ये तर ९७ बाधित गुजरातमध्ये आहेत.

चित्रपटगृहे, मॉल्सवरही निर्बंध येणार? शाळाही होणार बंद? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? वाचा सविस्तर!

देशभरात २२० मृत्यू

केंद्रीय आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशभरात २४ तासांत २२० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. व्यापक लसीकरणामुळे करोनाची बाधा झाल्यानंतर त्याचं स्वरूप गंभीर आजारात रुपांतरीत होण्याचं प्रमाण घटल्याचं दिसून येत असलं, तरी पुन्हा वेगाने वाढणारे बाधित आणि ओमायक्रॉनचा प्रसार चिंता वाढवणारा ठरत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुरुवारी दिवसभरात देशात ७ हजार ५८५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे भारताचा रिकव्हरी रेट हा ९८.३६ टक्के इतका आहे. तर सध्या देशात ९१ हजार ३६१ अॅक्टिव्ह करोनाचे रुग्ण आहेत.