देशभरात सध्या विविध धार्मिक स्थळांवरून वादाचं वातावरण निर्माण झालं आहे. ज्ञानवापी मशिदीच्या वादानंतर आता एका हिंदुत्ववादी संघटनांनी आपला मोर्चा दिल्लीतील प्रसिद्ध कुतुबमिनार या वास्तुकडे वळवला आहे. संबंधित वास्तू ही कुतुबमिनार नसून विष्णू स्तंभ असल्याचा दावा त्यांनी केलाय. यानंतर आता हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. याबाबत आता जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

त्यांनी असा दावा केला की, ‘५० टक्के परदेशी पर्यटक भारतात केवळ मुघल वास्तुकला पाहण्यासाठी येत असतात. तर उर्वरित ५० टक्के पर्यटक काश्मीर पाहण्यासाठी येत असतात. पण भाजपाने ही दोन्ही ठिकाणं उद्ध्वस्त केली आहेत’, असं त्या म्हणाल्या. दिल्लीतील कुतुबमिनारबाहेर एका हिंदुत्ववादी गटांनं आंदोलन करून कतुबमिनारचं नाव बदलून विष्णूस्तंभ ठेवावं अशी मागणी केली. त्यानंतर मुफ्ती यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे भारताची राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील अकबर रोड, हुमायून रोड, औरंगजेब लेन आणि तुघलक लेन यांसारख्या इतर महत्त्वाच्या खुणा मुघल शासकांच्या नावावर असल्याने त्या ठिकाणांची नावं बदलावी, अशी मागणी दिली भाजपाकडून सातत्याने केली जात आहे.

यावेळी मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मीरमधील अशांतता आणि या भागातील अल्पसंख्याक समुदायांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबतही भाष्य केलं. त्यांनी म्हटलं की, ‘भारत सरकारने काश्मीरकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलावा. सरकारने काश्मिरींवर दबाव आणला असून हिंदू विरुद्ध मुस्लीम असा वाद निर्माण केला जात आहे. तसेच इतर मुद्द्यांना दुर्लक्षित केलं जात आहे,” असंही मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या.