आगरतळा : त्रिपुरा पोलिसांनी रविवारी अटक केलेल्या दोन महिला पत्रकारांना सोमवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. या दोघी एच.डब्ल्यू. न्यूज नेटवर्कसाठी काम करतात. समृद्धी सकुनिया आणि स्वर्णा झा अशी त्यांची नावे आहेत. या दोघींविरोधात वार्ताकनातून धार्मिक विद्वेष पसरविल्याचा आरोप केला जात असला, तरी प्रत्यक्षात गुन्ह्याच्या प्रथम वर्दीमध्ये (एफआयआर) त्याची पुष्टी होईल असे काही नाही, असा दावा त्यांचे वकील अॅड. पियूष कांती बिस्वास यांनी केला. सरकारची कारवाई मनमानीपणाची असल्याचा आरोप त्यांनी केला. त्रिपुरामध्ये अलीकडे घडलेल्या काही कथित धार्मिक हिंसाचाराबद्दल बातम्या दिल्याप्रकरणी या दोघींना रविवारी ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना मुख्य न्यायिक दंडाधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी जामीन मंजूर केला. त्यांना गोमती जिल्ह्यातील उदयपूर तालुका न्यायालयात हजर करण्यात आले होते. रविवारी रात्री या दोघींनी आसाममधील निलमबाजार पोलीस ठाण्यात अटक करण्यात आले होते. त्यांना त्रिपुरा पोलिसांच्या विशेष पथकाने उदयपूर येथे आणले. न्यायाधीश सुब्रता नाथ यांच्यापुढे त्यांना हजर करण्यात आले. त्यांनी पोलिसांना तपासात सहकार्य करावे असे निर्देश देत न्यायाधीशांनी जामीन मंजूर केला. या दोघींना जामीन नाकारावा असे प्रथमदर्शिनी तरी काही दिसत नाही, असे न्यायालयाने नमूद केले. त्यांना ७० हजारांचे बंधपत्र आणि पोलिसांनी बोलावल्यास हजेरी लावण्याच्या अटीवर हा जामीन मंजूर करण्यात आला, असे बिस्वास यांनी सांगितले.