पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान २७ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणार आहेत. यादरम्यान संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानचे कान टोचले असून चेतावणी दिली आहे. “काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तान जितक्या खालच्या स्तराला जाण्याचा प्रयत्न करेल, तितकीच भारताची मान उंचावेल,” अशा शब्दांत सय्यद अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानला सुनावलं आहे. “पाकिस्तान नेहमी धक्के खात असतो, भारत मात्र उंच भरारी घेतो,” असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सय्यद अकबरुद्दीन यांनी न्यूयॉर्कमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बहुपक्षीय आणि द्विपक्षीय बैठका आणि व्यस्ततेवरुन भारत किती उंच भरारी घेत आहे हे अधोरेखित होत आहे”. “त्यांना काय हवं आहे की त्यांची इच्छा आहे. आम्ही दहशतवाद पाहिला आहे, आता ते द्वेषयुक्त भाषण देऊ शकतात,” असंही सय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटलं आहे.

सय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितलं आहे की, “संयुक्त राष्ट्रांपुढे एक देश पुन्हा एकदा त्याच मुद्द्याची पुनरावृत्ती करणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला कसं सादर करावं यासाठी प्रत्येक देशापुढे पर्याय असतो. पण काही देश आपलं म्हणणं मांडण्यासाठी खालच्या स्तराला जाऊ शकतात. पण आमचा स्तर उंचावेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. तुमचा स्तर जितका खालावेल, तितके आम्ही उंच भरारी घेऊ”.

“भारताने याआधीही आपल्या प्रगतीची अनेक उदाहरणं दिली आहेत. संयुक्त राष्ट्रांमधील आमच्या द्विपक्षीय आणि बहुपक्षीय बैठकींमधूनही भारत कशा पद्धतीने उंच झेप घेत आहे हे दिसेल,” असं सय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजना आणि प्राथमिकतांसंबधी माहिती दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unga syed akbaruddin jammu kashmir pakistan narendra modi sgy
First published on: 20-09-2019 at 11:28 IST