नवी दिल्ली, पीटीआय उत्तर प्रदेशात भाजपला २०१४ पेक्षा यंदा जास्त जागा मिळतील असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. घराणेशाहीच्या राजकारणाला जनता धडा शिकवेल असा दावा त्यांनी केला. २०१४मध्ये भाजपने राज्यात ७१ जागा जिंकल्या होत्या. समान नागरी कायदा लागू करणे हे भाजपच्या विषयपत्रिकेवर असून, धर्मनिरपेक्ष देशात सर्वांना समान कायदा असायला हवा अशी आमची भूमिका आहे असे शहा यांनी नमूद केले. उत्तर प्रदेशात भाजपने ८० पैकी ६२ जागा जिंकल्या होत्या. यंदा जास्त जागा जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ओडिशात सत्ताधारी बिजु जनता दल तसेच भाजप आघाडीबाबत भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा निर्णय घेतील असे शहा यांनी स्पष्ट केले. ओडिशाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, मात्र आमच्या कामगिरीत सुधारणा होईल हे निश्चित असे त्यांनी स्पष्ट केले. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाशी आघाडीबाबत पुढील दोन ते तीन दिवसांत चित्र स्पष्ट होईल. बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ पैकी २५ पेक्षा जास्त जागा भाजप जिंकेल असा दावा केला.